पंधरा अॉगस्ट, सव्वीस जानेवारी म्हटलं की शाळेपासूनचे जूने दिवस आठवतात. पंधरा दिवस आधीपासून तयारी चालू असायची. लेझीम पथक, शोभारथ असलं काहीबाही प्रत्येक शाळेच्या कार्यक्रम पत्रिकेत समाविष्ट असायचं. कोणीतरी प्रमुख पाहूणा येऊन देशभक्तीपर अंडी टाकून जायचा. आपला देश कसा महान वैगरे, याची उजळणी व्हायची. साधारणतः पाच सहा महीन्यांच्या फरकाने येणाऱ्या त्या राष्ट्रीय उत्सवांचा हेतू फारसा समजायचा नाही. समजायचा तो उत्साह.. स्वातंत्र्यदिन - प्रजासत्ताक दिन "साजरा" करण्यातला आनंद.
जसे दिवाळी होळी गणपती.. तसेच हे दोन दिवस. सत्यनाराणच्या पूजेला "श्रीहरी जगत्पीता, दूर करी तो व्यथा.. "वाजतं तसं इथं महेंद्रकुमार त्याच्या भरड आवाजात "भारत का रहनेवाला हूँ," असं म्हणत भारतची बात सुनवायचा.
या सगळ्याचा जरासा उबग येऊन यावर प्रश्न पडायचा काळ त्यामानाने उशिराचा. आत्ये मामे चूलत असे तीन-चार भाऊ मी डिप्लोमाला गेल्यावर भारत सोडून इतरत्र गेले. त्यांचा परदेशी थाट काय असेल तो माहीत पडायचा नाही. पण, इतरांकडून त्यांचं जाम कवतिक व्हायचं. आपल्या महान देशातून लोकं परदेशी पळ का काढतात याची कारणं 'ब्रेन ड्रेन'विषयीच्या लेखांत असायची.
डीग्रीनंतर मला परदेशी जाऊन शिकायचं होतं. पण, मी 'स्वदेस' मधल्या मोहन भार्गव सारखं भारतात परतणार होतो. कारण, रंग दे बसंती मधल्या आर. माधवननं सांगितलं होतं. "कोई भी देश पर्फेक्ट नही होता, उसे पर्फेक्ट बनाना पडता है".. ते परदेशी शिकायला जाणं पैशांच्या अडचणीमुळं शक्य झालं नाही. पण, याच काळात या एकाच देशात धर्म- जाती- पाती - आर्थिक परीस्थितीमुळं विभागलेले लक्षावधी देश राहतात, हे कळून चुकलं. विविधता में एकता कुठं दिसत नाही फारशी. आमच्या वागण्यात मात्र एकसूत्रता आहे. १५ अॉगस्ट , २६ जानेवारी "साजरे" करायच्या पद्धती जवळपास देशभर सारख्याच आहेत.
"आपला देश लय भारी, आपला देश महान" या भ्रमातून बाहेर येऊन तीन-चार वर्षं झाली. त्यामुळे या भौगोलिक भागाला जरा अधिक जगण्यायोग्य बनवण्यासाठी इतिहास डावलून भविष्याकडे नजर ठेवत ३६५ दिवसातील जास्तीत जास्त दिवस धडपड करण्याचा निश्चय आपसूक केला गेला. इतिहासाच्या मढ्यावर भविष्यातील पिढ्या पोसणं फार्फार अवघडै.
गेल्या आठवड्यात कोकणभर जागवलेल्या जलअभियानाचा हलका शीण जाणवतो आहे. झोपेचा अनुशेष भरून काढायचा आहे. त्यामुळे, उद्या छान-छान कपडे घालून, छातीवर - हातात झेंडे मिरवत अधिकृत / अनधिकृत ध्वजस्तंभांवर फडफडणाऱ्या कापडी झेंड्यांना सकाळी कडक, ढिसाळ, खणखणीत, पुचाट सॕल्यूट मारणाऱ्यांना बघायला जाणं कदाचित जमणार नाही. त्यांनी जागविलेल्या देशभक्तीतून निर्माण झालेला - फाटलेल्या कागदी झेंड्यांचा, वडापाव जीलेबीच्या पुडक्यांच्या रिकामी कागदांचा, फटाक्यांचा, चुरलेल्या हारांचा कचरा - त्या उत्साहाची साक्ष तीन-चार दिवस देईलच. सत्तावीसला सगळे आपल्या नेहमीच्या वेशात लोकलला लोंबकळत असतील, रीक्षा बससाठी झोंबत असतील. रस्त्यावर पसरलेल्या कचऱ्याच्या दुर्गंधीला प्रतिक्षिप्त क्रीया म्हणून मी तिथंच थूंकेन. त्या कचऱ्यात एखादं मरतुकडं कुत्रं आणि दोन कळकट पोरं जगण्याचा आधार शोधत असतील.
थोडक्यात, भारताचा इतिहास महान आहे या विचारावर आपण आगामी स्वातंत्रदिनाची, मग प्रजासत्ताक दिनाची, मग पुन्हा स्वातंत्र्य दिनाची वाट पाहू.. जवळपास सत्तर वर्ष अशीच गेली. आणखी सातशे वर्षंही जातील! जय हिंद!
This blog is not dedicated to a specific purpose. The blogger wanders through many fields and expresses his experiences in his style.
Search This Blog
Monday, January 25, 2016
जय हिंद. जय १५ अॉगस्ट २६ जानेवारीमधला हिंदोळा.
Friday, January 8, 2016
अभियंत्यांना अॉनलाईन परीक्षांसाठी मार्गदर्शनपर..
मुंबई महापालिकेच्या सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदासाठी पदवीपश्चात ५ वर्षांचा अनुभव बंधनकारक आहे.
पदवी नंतरच्या पाच वर्षांत इतरत्र काम करताना तसंच लग्न -मूलं- संसार हे विषय चालू झाले असल्यास त्यासाठी वेळ देण्यामुळे एका ठिकाणी बसून अभ्यास करण्याची सवय १००% सुटलेली असते. तसंच रोजच्या धावपळीत अभ्यासासाठी वेगळा वेळ काढणे शक्यच होणार नाही. म्हणून स्वतःभोवती अभ्यासाचे वातावरण निर्माण करणं अत्यावश्यक आहे. ते कसं करता येईल?
वर सांगितलेल्या वेळेचा वापर करण्यासाठी गूगल प्ले स्टोअरवरून Civil engineering GATE असं शोधून काही ॲप्लीकेशन्स डाऊनलोड करा. या ॲप मध्ये ५०० हून अधिक प्रश्न आहेत. १० ते २० प्रश्नांच्या या प्रश्नपत्रिका "वस्तूनिष्ठ बहुपर्यायी (Multiple Choice objective) या प्रकारच्या असतील. त्यातील कमीत कमी पाच कोणत्याही प्रकारचा अभ्यास सुरू करण्याआधी सोडवा. यामुळे आपण कुठे आहोत, हे समजण्यास मदत होईल. तसंच प्रश्न कसे वाचायचे व तुमची वैयक्तिक बलस्थानं व कमकूवत भाग (Topics) यांचा अंदाज येईल.
गूगल प्ले स्टोअरवरून Madguy Softlab यांचं ॲप मिळवा. ॲप( http://madguylab.com/app.php?u=344640 )तसंच quantitative formulas या ॲप मधील एकत्रित सूत्र (Formulas) किंवा इंटरनेटवरून विविध उप विषयांच्या (SubTopics) यांची प्रत छपाई करून त्या आपल्या घराच्या भिंतींवर किंवा कामाच्या ठिकाणी तुम्ही येता जाता पाहू शकता अशा तऱ्हेने लावा. सूत्रं डाऊनलोड करा. www.careerarm.com/437-quantitative-aptitude-formulas-shortcuts/
पहीला आठवडा:
१ ते ३० पर्यंतच्या पाढ्यांचं कोष्टक, १ ते २० पर्यंत वर्ग वर्गमूळ, १ ते १० घन घनमूळ यांची छापील प्रत घरात/ कामाच्या ठिकाणी लावा. येता जाता नजर मारून ते "तोंडपाठ" करा. तोंडपाठच करा. बरेच दिवस स्मरणशक्तीला चढलेला गंज काढून टाकण्यास प्रचंड मदत होईल. याशिवाय अतिशय महत्वाची गणिती समीकरणं ही जोडीला चिकटवता येतील. तसंच Brain optimizer या सारखे मोबाईलमधिल गेम्सही अभ्यासात चवीसाठी वापरावेत.
जास्तीत जास्त तांत्रिक (technical )इंग्रजी वाचण्याचा सराव करा. प्रश्न समजण्याचा वेग वाढला तरच वेगाने उत्तरं देता येतात.
प्रवास व कामाच्या ठिकाणी ॲप्लीकेशन्समधून वाचलेल्या प्रश्नांच्या जोडीला खन्ना पब्लीकेशन यांचं अगोर व एस. चंद पब्लीकेशनच्या 'गेट' परीक्षेसाठीच्या पुस्तकांतून अधिकाधिक बहुपर्यायी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. http://madguylab.com/ या वेबसाईटवर उपलब्ध असलेली ॲप्लीकेशन्स बुद्धीमत्ता मापन या भागासाठी उत्कृष्ट आहेत.
परीक्षा जवळ आलेली असेल, www.indiabix.com या वेबसाईटवर जाऊन संगणकासमोर बसून बहुपर्यायी प्रश्न व नमूना प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करा.
एक ओळखपत्र आणि परीक्षा तिकीट यांची झेरॉक्स प्रत आठवणीने सोबत ठेवा. एक चांगला पेन व शक्यतो स्वचलीत पेन्सिल सोबत ठेवा. परीक्षा केंद्रावर पंधरा मिनीट आधी बसवलं जातं.
संगणकासमोर बसल्यावर सर्व यंत्रणा सुरळीत आहे याची खात्री करून घ्या. दिलेल्या सर्व सूचना लक्षपूर्वक वाचा व ऐका. कच्च्या कामासाठीचा कागद हातात आल्यावर परीक्षा निरीक्षकाच्या लक्षात येणार नाही अशा बेताने आठवणारी महत्वाची सूत्रं पटापट लिहून काढा. विशेषतः Streams, trains, trignometry angles इ. ऐन वेळी उडणारा गोंधळ टाळण्याचा हा उत्तम पर्याय आहे.
तुमचा सराव चांगला झाला असल्यास तुमचे कच्चे व पक्के दुवे तुम्हाला माहीत असतील. प्रश्नपत्रिका समोर यायला दोन-चार मिनीट असतील तेव्हा दीर्घ श्वास घेऊन मन शांत करा.
स्वतःलाच बजावून सांगा. "आता नाही तर कधीच नाही!"
१. बुद्धीमत्ता मापन (aptitude) २० प्रश्न.
२. सामान्य अध्ययन (general knowledge) / व्यवस्थापन (management) २०/ ३० प्रश्न
३. तांत्रिक (Technical) ६०/५० प्रश्न
प्रत्येकी एक गुण असलेल्य १०० प्रश्नांसाठी ६० मिनीटे.
प्रत्येक प्रश्न वाचून उत्तर देण्यास सरासरी ३६ सेकंद.
ही वेळेशी स्पर्धा आहे.
तांत्रिक आणि सामान्य अध्ययन यात दहा प्रश्न अनुत्तरीत राहीले तरी चालतील. उर्वरीत साठपैकी ४५-५० बरोबर आले आणि इतर चूकले तरी उणे गूणांकन होऊन ४० ते ४५ गुण मिळतील. बुद्धीमत्ता मापन हा सरावाने हमखास गूण मिळवून देणारा विभाग. यात वीसपैकी १५ गूण कमीतकमी मिळाले तर ५५ ते ६० गूण निश्चित मिळतील. उणे गूणांकन पद्धतीत ५५ गूण ही यशाची खात्रीच. उरलेला भाग रीक्त पदांची संख्या आणि तुमचं नशिब यावर अवलंबून आहे.
१. रोज सकाळी रात्रभर भिजवलेले दोन-चार बदाम खा. तेलकट, सुस्ती आणणारे पदार्थ टाळा. वर्ज्य नसल्यास उकडलेल्या अंड्यांचा पांढरा भाग खा. भरपूर पाणी प्या.
२. थोडा बदल म्हणून किंवा विश्रांतीच्या काळात मेडीटेशन (ध्यानधारणा) संगीत आवर्जून ऐका. आवडत नसल्यास बिथोवेन , मोत्झार्ट आदींच्या संगीतरचना ऐकणे. ओळखीचं संगीत / चित्रपट संगीत ऐकताना विचार भरकटत कुठेही जातात. तो धोका सुचवलेल्या संगीताने टळतो.
Tuesday, January 5, 2016
प्रणवच्या १००९* धावांच्या निमित्तानं ..
'प्रणव धनावडे' या कल्याणच्या के.सी गांधी शाळेच्या मुलानं एका सामन्यात ३२३ चेंडूत १००९* धावांची विश्वविक्रमी खेळी करत ०५.०१.२०१६ रोजी एक नवा इतिहास रचला आहे. एका डावात सर्वाधिक धावांचा हा वैयक्तिक स्तरावर एक नवा उच्चांक आहे.
प्रणवच्या या पराक्रमाचे अख्ख्या देशाला कौतुक वाटले नसते तरच नवल. प्रणववर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. सचिनसह क्रिकेट विश्वातल्या दिग्गजांनी त्याला शाबासकी दिली आहे. तर राज्य सरकारने त्याच्या पुढील शिक्षण व प्रशिक्षणाचा खर्च उचलण्याचं आश्वासन दिलं आहे.
नेहमीप्रमाणे काही चमको लोकांनी याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला आहे. पी हळद आणि हो गोरीपेक्षाही वेगवान असलेल्या - 'ह' असा उच्चार केला तरी गोरे होणारे वृत्तनिवेदक तर त्याला थेट पुढचा सचिन, महान खेळाडू वैगरे शिक्के मारून मोकळे झाले आहेत. प्रणव आता जेमतेम १५ वर्षांचा आहे आणि या खेळीने त्याच्यासमोर प्रचंड आव्हानं उभी केली आहेत.
आयपीएल सहीत इतर काही घडामोडींमुळे शुद्ध क्रिकेटला पारख्या झालेल्या भारतीयांना प्रणवमध्ये एक आशेचा किरण दिसू लागतोय तोच काही उतावळे बैल त्याला डोक्यावर घेऊन सैरावैरा पळत सुटलेत. त्याला आयपीएलच्या तमाशात सामिल करून घ्यायचीही आता चढाओढ चालू होईल. उन्मुक्त चंदसारखा गुणी युवा खेळाडू सध्या धावा करायला झगडतो आहे. आयपीएल आणि क्रिकेटच्या बाजारीकरणाला याचं सारं श्रेय.
क्रिकेटचा निस्सीम चाहता क्रिकेटवरच प्रेम करतो, क्रिकेटरवर नाही. आयपीएलला हजारो रुपयांची तिकीटं काढून जाणाऱ्यांमध्ये हौशे गवसेच जास्त असतात. अशी माणसं रसिक नाही तर चंगळखोर असतात. ते कुठेही गर्दी करू शकतात. मग तो सामना असो, रीएलीटी शो असो वा सेलेब्रीटी गरबा.
खरा क्रिकेट रसिक पहायचा तर तो कुठल्याही मैदानावर दिसतो. मुंबईत चर्चगेट जवळच्या ओव्हल मैदानावर लोखंडी गजांतून तोंड खूपसून अनोळखी खेळाडूंचा खेळ पहाणारा, काल परवा प्रणव खेळत असताना मैदानाबाहेर थांबून खेळ पहाणारा असतो खरा क्रिकेटप्रेमी. प्रणवने या रसिकांना खूप दीर्घकाळ त्याच्या फलंदाजीचा आस्वाद देण्याचा दृष्टिकोन बाळगला तर तो निश्चित सार्वकालीक महान फलंदाजांच्या मांदीयाळीत विराजमान होईल.
सचिनच्या सर्वांर्थाने भव्य ठरलेल्या कारकीर्दीचे खरे शिल्पकार म्हणजे त्याचा मोठा भाऊ अजित आणि गुरू रमाकांत आचरेकर. या दोघांनी सचिनच्या कुठल्याही खेळीचं तोंडदेखलं कौतुक न करता त्याला सतत चूका सुधारायला मदत केली.
उगवत्याला दंडवत ठोकणारी मंडळी कोणालाही उध्वस्त करू शकतात. अशा लोकांपासून त्याला पुढची दहा वर्ष तरी लांब ठेवण्याची जबाबदारी त्याचे आई-बाबा , शिक्षक , प्रशिक्षक आणि काही अंशी आपलीही आहे.
Saturday, January 2, 2016
भूतांपासून मुक्ती.
भटकणारे आत्मे उर्फ भूतांच्या भितीतून मुक्ती.
सन २००९-१०.
. रिलायन्समधे असताना तिरुपती - तीरूत्तानी- चेन्नई या रस्त्याच्या सर्वेक्षणासाठी गेलो होतो. एकटा जाण्याची पहीली वेळ नव्हती. पण, हा रस्ता जरा जास्तच सुनसान होता. १४० कि.मी च्या पट्ट्यात मोजकी शहरं हायवेला लागून होती.
दोन्ही बाजूला फिरता यावं म्हणून तीरूत्तानी जवळ आंध्रप्रदेश पर्यटन मंडळाच्या एका रेस्ट हाऊसमधे एक ऐसपैस खोली ठरवली. दिवाळीनंतरचा सुमार होता. पर्यटक जवळजवळ नव्हतेच. त्यामुळे ते भलंमोठं रेस्ट हाऊस, फक्त तिथला कर्मचारी वर्ग आणि माझी जहागिर होती. रोज सकाळ संध्याकाळ आंबवलेले दाक्षिणात्य पदार्थ खाऊन पोटाचा गॕस चेंबर जबरदस्त कामगिरी करू लागला होता. अन्ना लोकं हवा खेळती रहावी म्हणूनच लुंग्या लावतात, असा माझा ठाम समज त्या दौऱ्यातच झाला.
सर्वेक्षणासाठी तिथल्याच लोकांना हाताशी धरून चार टिम कामाला लावल्या की आपण दोन आठवडे इकडे तिकडे हिंडून माहीती गोळा करत बसायचं, असा कार्यक्रम. कामाची ठराविक वेळ नसायची. गाड्या मोजायला बसलेली पोरं नीट काम करत आहेत की नाही ते बघायला मध्यरात्री पण एखाद चक्कर मारावी लागायची.
रीलायन्सने पैसा काम कसा करतो ते चांगलंच शिकवलं. जमवलेल्या पोरांमधून एखादा चूणचूणीत , जरा महत्वाकांक्षी पोर बघून त्याला ज्यादा पैशाचं आमिष द्यायचं, की आपले खबरी तयार. असा सगळा प्रकार होता.
रात्री चक्कर मारायला निघालो, की डोळ्यांवर आधीच पेंग असायची. त्यात गाड्यांचे लाईट्स आणि रस्त्याबाजूची झुडूपं सावल्याचे खेळ मांडायचीत. काय वाट्टेल ते भास व्हायचे. कधी त्यात हत्तीच दिसायचा, कधी एखादा चेहराच.. आणि ती!
ती म्हणजे मी ज्या खोलीत थांबलो होतो त्या खोलीतल्या चित्रात असलेली मुलगी. खोलीत सजावटीसाठी एका राजस्थानी मुलीचं पेंटींग लावलं होतं. अतिशय छान रंगवलेले भाव, बोलके डोळे बीळे.. आता फार अलंकारीक शब्द आठवत नाहीत. छानच. पण, तरीही भिती वाटायची. रात्री खोलीत येताना वाटायचं ही पोरगी 'आहट' टाईपने आत बसलेली असेल तर..?
फाटायची. शब्दशः फाटायची. पण, मग हिंमत करुन आत जायचो. रूममधून निघताना एक छोटा बल्ब चालूच ठेवून जायचो. ती बिचारी चित्रातच असायची.
दोन तीन दिवसांनी चेन्नईतून दहा एक किंगफिशर आणल्या. रूममध्ये आलो की त्या चित्राकडे न बघता एक ढोसायची आणि तोंडावर पांघरूण खेचून झोपून द्यायचं.
त्या काळात ट्रेकींग सातत्याने करायचो त्यामुळे भिती फारशी उरली नव्हती. पण, तिथे मोठं टोळकं असायचं. कॉलेजच्या काळात रूमवर एकटा राहायचो पण ते मुख्य वस्तीत घर होतं आणि रुममध्ये असं चित्र नव्हतं.
आठ-दहा दिवसात त्या मुलीची चित्रातून बाहेर पडण्याची खटपट न दिसल्याने मी जरा आणखी बिनधास्त झालो. एका रात्री अल्लू अर्जूनचा 'वरूडू' हा चित्रपट बघून आलो. दोन बीयर ढकलल्या आणि माझ्यात एकदम 'विक्राल और गबराल' मधला मामिक घुसला.
आयच्चा. आज बघतोच या भूतनीला.
मी त्या चित्रासमोर उभा राहिलो. तिसरी बीयर हातात. मी तिचं निरीक्षण करू लागलो. भिती नाहीशी होऊन ती अचानक लय भारी वाटू लागली मला. बराच वेळ एकटक पाहीलं असेल तिला.
मग माझा द ग्रेट संशयी मेंदू नशेतून जागा झाला. तो विचार करू लागला. ही खरंच बाहेर आली तर तिची उंची साधारण किती असेल? म्हणजे चित्रातल्या बाकी तपशीलाचं भूमितीय गणित मांडलं तर साडे पाच फूटांपर्यंत असू शकेल. आणि ती राजस्थानी बोलेल की तेलूगू? असे एकापेक्षा एक महागुरू विचार आदळू लागलो. अचानक वाघ झालेल्या मला ती रंगवलेल्या डोळ्यांनी बघत राहीली. तिथून निघताना मी त्या चित्राचा फोटो घेतला होता.
हा एक प्रसंग होता. जिथे मला घाबरण्याची, झालंच तर आमच्या कोकणी आवडीनूसार झपाटण्याची वैगरे संधी होती. पण, स्वतःवर ताबा मिळवून मी ती गमावली. त्यानंतर कित्येकदा तथाकथित झपाटलेल्या जागांवर मी भटकलो आहे. पण, त्यावेळी एकच विचार असतो - भूत बायचान्स आलंच तर त्याला कसं मेंटल बनवायचं. इतरांच्या मानलेल्या भूतांच्या सुदैवाने त्यांची माझी गाठभेट अद्याप पडलेली नाही.
देवाबद्दल थोडंसं.. दीर्घ!
खूप दिवसांपासून मांडायचं होतं मला देवाबद्दल काय वाटतं ते.
साधारणपणे सर्व धर्मांत देव ही संकल्पना आहे. त्या जोडीला आत्मा, आत्म्याला जोडून पाप, पूण्य आणि पूनर्जन्म या ही गोष्टी येतात. बौद्ध आणि जैन ही नास्तिक दर्शने परमेश्वर मानत नाहीत. पण, आत्मा-पाप-पूण्य अशा बाबींवर त्या मान्यता आधारलेल्या आहेत. यात आणखी प्रार्थना/नमाज, प्रार्थनास्थळं, उपास तापास या गोष्टींची भर घातली जाते. याला सेवा, सत्संग अशी नावं चिकटवून या सर्व पदार्थांच्या भेळीला ढोबळमानाने "अध्यात्म" म्हणतो आपण.
याची सुरूवात कुठून झाली असेल, या विषयात खोल जाणं टाळूया. पण, उत्क्रांत होत असलेल्या माणसाला त्याच्या बुद्धीबाहेरच्या सर्व बाबींना त्याने अज्ञात अतिंद्रीय शक्तींचं लेबल लावलं आणि माणसासोबत या ही गोष्टी विकसित होत गेल्या.
यात अलिकडचे म्हणजे चार-पाच हजार वर्षांपूर्वीचे काही जिज्ञासू मानव जाम डोकं खूपसू लागले. प्रत्यक्ष / प्रमाण/ अनुमान यांची मागणी करू लागले. यात आद्य आणि आघाडीवर होते भारतीय चार्वाक/लोकायतिक. त्यांना इतर सश्रद्ध लोक नास्तिक/ काफीर/ अॕथीस्ट म्हणू लागले.
अगदी हल्ली, म्हणजे चार एकशे वर्षांपासून नव्या विचारधारांची संख्या वाढू लागली. वेगवेगळ्या क्षेत्रांत नवनवे विचार ओतणारे हे प्रवाह 'विज्ञान' या एका झेंड्याखाली एकवटले आणि जोमाने वाढू लागले. मानवी इंद्रीयांच्या मर्यादा यंत्रांच्या सहाय्याने धडाधड पार होवू लागल्या आणि नव्या विचारधारांमुळे अध्यात्मावर आधारीत जम बसवलेल्या विचारधारांना खतरनाक झटके बसू लागले.
आता ही दोन शतकं (सन १९०० ते २०९९) परावर्तनाची (transformation) म्हणूनच संघर्षाची आहेत. एकीकडे दणादण हजारो वर्षांपासूनची कोडी सोडवणाऱ्या विज्ञानाचं सुप्त/प्रकट आकर्षण तर दुसरीकडे मेंदूवर पारंपारिक विचारांचा विळखा, अशा कात्रीत सापडलेल्या पिढ्यांचे आपण प्रतिनिधी. विज्ञानाची पद्धत आणि धार्मिक शिकवण यांत प्रचंड विरोधाभास आणि फार क्वचित साम्य आहे. आपण ते इवलसं साम्य गच्च पकडून अध्यात्मासोबत विज्ञानालाही मिठीत घेऊ पहातोय आणि आपली जबरदस्त फरपट होतेय.
आता जरा 'आत्मा' पाहूया.
आत्मा म्हणजे काय, याच्या प्रत्येक विचारधारेच्या वेगळ्या संकल्पना आहेत आणि यात भयानक गोंधळ आहे. आत्मा हे अभेद्य, अविनाशी तत्व आहे, असं सामान्यपणे मानलं जातं. पण ते नक्की कसं आहे याबाबत एकमत नाही. जैनांच्या मते आत्मा असं तत्व आहे जे शरीराच्या आकारानुसार स्वतःला लहान मोठं करतं. म्हणजे आत्मा हा शरीराच्या आकाराचा असतो. इतर काहींच्या मते आत्मा ही परमात्म्याशी जोडलेली त्याची सूक्ष्म प्रतिकृती आहे. आत्मा असतो कुठे आणि तो शरीर का आणि कधी सोडून जातो हे गणित या विचारधारांना आजवर सुटलेलं नाही. त्यामुळेच "पृथ्वीवरुन" त्याची हकालपट्टी स्वर्गात किंवा नरकात केली जाते. ज्यांचा ठावठिकाणासुद्धा आत्मा समर्थकांना माहीत नाही.
आता माझा मेंदू असं म्हणतो, की जगणाऱ्या प्रत्येक सजीवात आत्मा आहे तर माझं शरीर ज्या अब्जावधी सजीव पेशींनी बनलेलं आहे, त्या प्रत्येकीत एक आत्मा असला पाहीजे. शिवाय, बाहेरून आत जाणारे जीवाणू विषाणू किटाणू हे ही सजीवच. मग ते आत्मे त्या अब्जावधी आत्म्यांना सामील होतात. पण, मग या अब्जावधींमध्ये माझा आत्मा कुठला? माझ्या ज्या पेशी मी लहानगं बाळ असताना नव्हत्या किंवा म्हातारपणात नसतील त्या पेशींची बेरीज वजाबाकी आत्म्यामध्ये होते? याचं उत्तर १००% कुठल्याच विचारधारेत नसणार आहे.
कारण, असंख्य पेशींचा गोतावळा म्हणजे शरीर हे सत्य आधुनिक वैद्यकशास्त्राने लोकप्रिय केलं आहे. शरीर म्हणजेच मी. शरीर एक जैवरासायनिक यंत्र आहे जे विविध प्रकारच्या उर्जांनी व विद्युतप्रवाहांच्या प्रक्रीयेमुळे चालतं. त्याच्या महत्वाच्या यंत्रणा ढासळल्या की ते बंद पडतं. यालाच आपण "मृत्यू" म्हणतो. या स्पष्टीकरणामुळे आत्मा, परमात्मा, पाप-पुण्याच्या हिशोब आणि त्याला जोडून भूतयोनी, स्वर्ग नरक तसंच पुनर्जन्म या गोष्टी आपसूक बाद होतात. कुठलीही धार्मिक विचारधारा या स्पष्टीकरणाचं समर्थन करणार नाही.
आता 'देव' या संकल्पनेकडे वळूया.
देव ही संकल्पना आत्म्याच्या संकल्पनेपेक्षाही गोंधळाची आहे. खरं तर ती व्यक्तीगणिक बदलते असं म्हणता येईल. हिंदू वैदीक विचारधारेत परमात्मा किंवा नैसर्गिक शक्तींना देव मानण्याची प्रथा आहे आणि माणसांच्या मागण्या पुरवणं हे देवांचं कर्तव्यच आहे, अशीही मानसिकता आहे. यासाठी देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी यज्ञ केले जात. आजचे 'नवस' हे त्याचं बदललेलं स्वरूप. एकच परमतत्व सर्वत्र असल्याच्या भावनेमुळे कुठलाही देव कुठल्याही स्वरूपात बघता येतो. स्वामी समर्थांचं लक्ष्मीरूप, किंवा दिवाळीत कोकणात बदलले जाणारे देवतांचे मुखवटे हे याचं निदर्शक. रूप पालटण्यापासून - ते - स्वच्छता हिच देवता, देव माणसातच पहावा - इथपर्यंत या कल्पनेचा विस्तार करता येतो. हिंदू धर्माचा वैचारीक विस्तार इतरांपेक्षा कित्येक योजने प्रचंड आहे. इस्लाम आणि ख्रीश्चन धर्म एकच एक देव मानतात आणि त्यांचा देव इतरांनीही मानावा यासाठी जिहाद, क्रूसेड असे घात मार्ग अवलंबतात. त्यांच्या प्रेषितांनी दाखवलेला मार्ग हा अंतिम असतो. जैन आणि बौद्ध या भारतीय विचाराधारा देव मानत नाहीत, पण देवमाणसं (तिर्थंकर/ झेन/ गुरू) मानतात. यातील कुठल्याच विचारधारा निर्दोष नाहीत आणि त्यांना मानणाऱ्यांच्या आचार-विचारांत प्रचंड फरक सातत्याने जाणवतो.
माणसांत देव पहाणाऱ्या हिंदू धर्माच्या शाखांमध्ये जातियता आणि इतर भेदाभेदांचं विष पसरलेलं आहे. इस्लाम अल्लासाठी माणसं (काफीर) मारण्याला प्रवृत्त करतो, ख्रिस्ती स्त्रीयांना जबरदस्त कमी लेखत आले. जैन आणि बौद्ध या विचारधारा इतक्या काटेकोर नियमांवर आधारीत आहेत की त्यांचं शब्दशः पालन नेहमीच्या आयुष्यात अशक्यप्राय वाटावं. असा सगळा सावळागोंधळ आहे.
माणसाच्या आयुष्यातील अनिश्चितता देवाची मागणी करते. अडचणीच्या प्रसंगी वाटणारा भावनिक आधार म्हणजे 'देव.' सुखाच्या प्रसंगात विघ्न येऊ नये म्हणून देवाची प्रार्थना केली जाते. म्हणजेच देवांनी कशाच्या तरी बदल्यात आपलं अनिश्चित - विशेषतः दुःखदायक घटनांपासून आपलं रक्षण करावं, हा सरळसोट न्याय आहे. मग ती साधी प्रार्थना असेल किंवा यज्ञयाग. नमाज असेल वा कुर्बानी. 'देव भावाचा भुकेला' वैगरे उपमा ज्यांची देवाला भन्नाट काहीतरी भेटवस्तू चढवण्याची "आर्थिक" कुवत नाही अशांसाठी बनवलेली एक समजूत काढणारी कथा आहे.
सुरूवातीपासूनच देव आणि मानव हा देवाणघेवाणीचा व्यवहार राहीला आहे. बहुतांश प्रार्थना आणि आरत्या/भजनांची "फलश्रूती" पाहील्यास त्यात "भौतिक मागण्या"च दिसून येतात. उदा. श्रीगणेशस्तोत्र : विद्यार्थी लभते विद्याम्, धनार्थी लभते धनम्. स्तोत्र आरत्यांमधील सूप्त 'लाभवाद' आपण फारसा लक्षात घेत नाही. स्वार्थ कुठला आणि परमार्थ काय यातला फरक अतिशय पुसट आहे. यामुळेच प्रत्येकजण त्या अर्थाला आपापल्या हिशोबाप्रमाणे वाकवू शकतो.
देवधर्म हा एक पुरातन धंदा आणि एक अवाढव्य अर्थव्यवस्था आहे. आजच्या काळात त्याचे लाभार्थी किती आणि कोण हे आकडेवारीनिशी मांडलं पाहीजे. अमूक एका नवसाला पावणाऱ्या देवतेला एका वर्षभरात किती नवस केले जातात आणि त्यातील किती सफल होतात ते शोधल्यास या दाव्यांचा खरेखोटेपणा उघड होईल.
हे असं वास्तव असताना- जी एक शक्ती विश्वाचं संचलन करते आहे (असं आपल्याला वाटतं) ती कोण आहे? धर्म हे त्या शक्तीशी बांधीलकी दाखवण्याचे मार्ग असतील तर त्या मार्गांचा अंतिम मुक्काम कोणता आहे? धर्म नष्ट झाले तरी ती शक्ती राहीलच असं आपल्याला वाटतं. एरवी एकमेकांवर खच्चून टिकेचा भडीमार करणारे विविध धर्मांचे अनुयायी या अदृश्य शक्तीसाठी निरीश्वरवादा विरोधात एकवटतात हे एक मजेशीर चित्र आहे.
विश्व स्वसंचलित आहे, यात गणिती सूत्रबद्धता (Order) आणि अनाकलनीय अनिश्चितता (chaos) यांच अफलातून मिश्रण पहायला मिळतं. मुळात प्रत्येक गोष्टीला एक आदी आणि एक अंत असतो असं आपल्याला वाटणारच. कारण, आपली वाढ तशाच वातावरणात झालेली आहे. म्हणूनच विश्वाचाही कोणीतरी निर्माता असणार, त्याला आपल्या आयुष्यात ढवळाढवळ करायची आवड असणार, असं आपण गृहीत धरतो. त्याच्या भितीखातर पूजन करतो. पण, या निर्मात्याचा निर्माता कोण असा प्रश्न आपण विचारत नाही. तो अनादी अनंत आहे असं जर आपल्याला मान्य असेल तर विश्व अनादी-अनंत असायला काय हरकत आहे? असं मात्र आपण मनात आणत नाही.
देवाचं अस्तित्वच न मानणारे कित्येक लोक आयुष्य सुखात घालवतात. मग देव त्यांना मृत्यूपश्चात शिक्षा करत असेल का? निश्चितच नाही. कारण, मृत्यूपश्चात शिक्षेसाठी आत्म्यासारखं काही असावं लागेल आणि आत्मा हा प्रकारच अस्तित्वात नसतो यावर मी १००% ठाम आहे.
मग देवच नाहीय का?
याचं उत्तर द्यायला मी कचरतो. कारण, बालपणापासून आजतागायत असंख्य गोष्टी आणि भावना देव या संकल्पनेशी जोडल्या गेल्यात. देव अचानक नाकारला तर जगण्यात एक मोठी पोकळी निर्माण होईल. जी भरायला सध्या कोणतंच साधन नाही. विशेषतः माझ्यासारखा आधीचा श्रद्धावान मनुष्य एकाएकी देवाला रिटायर नाही करू शकत. पण, मी त्याच्यावर दिलेल्या जबाबदाऱ्या कमी केल्यात. हल्ली मी काहीही मागत नाही. जे मिळतंय त्याचं काही श्रेय स्वतःला आणि काही नशिबाला (अनिश्चिततेला) देतो. पण, माझ्या आईचं म्हणणं असं असतं की तू देवाला मागण्या करून त्रास देत नाहीस म्हणून तुला तो स्वतःहून देतो. मी तिचा युक्तीवाद खोडायचा प्रयत्न करत नाही. कारण, ती स्वतः प्रयत्नवादी आहे. आपलं काम आपण करायचं, निकाल देवावर सोडायचा, असा तिचा खाक्या.
देवाशी देवाणघेवाणीचे व्यवहार संपवत आणले असले तरी इतर कुठल्यातरी शक्तीचं अस्तित्व मी सरळसरळ नाकारत नाही. आईनस्टाईनच्या सापेक्षता सिद्धांतावर झालेलं अलिकडचं संशोधन असं म्हणतं की, मिती (dimensions) आपल्याला दिसतात त्याहून जास्त असू शकतील. सजीवांच्या इंद्रीयांना मर्यादा आहेत. माणसाकडे सर्वात जास्त उत्क्रांत मेंदू असल्याने तो या मर्यादा ओळखून त्या "यंत्रांच्या" मदतीने पार करू शकतो. साधनेने अतिंद्रीय शक्ति मिळवता येतात हा दुष्प्रचार मी अजिबात मानत नाही. एखादी सजीव जमात अशी असू शकेल की त्यांना आपल्यापेक्षा जास्त मितीतील विचार करता येत असेल किंवा तसं जगता येत असेल. ('अवतार' किंवा 'इंटरस्टेलर' या हॉलीवूडपटांत या संकल्पना पुसटश्या मांडल्या गेल्यात.) पण, त्यांना माझ्या जीवनात फार रस असेल असं मला बिलकुल वाटत नाही. न्यूट्रीनोंसारखे कशालाही पार करून जाणारे मूलकण काही चमत्कारीक वाटणाऱ्या गोष्टीं घडायला हातभार लावत असतील. अशा हजारो शक्यता सांगता येतील. पण, त्यांचा उलगडा वैज्ञानिक चिकीत्सेतूनच व्हायला पाहीजे याबाबत मी आग्रही आहे.
देव, अतिंद्रीय शक्ती अशा अदृश्य गोष्टी "विकणाऱ्या" लोकांपासून इतरांनी सावध राहीले पाहीजे.अनुभव / अनुभूती हे व्यक्तीसापेक्ष म्हणूनच बेभरवशी असतात. अनुभवांपेक्षा वारंवार सिद्ध करता येणाऱ्या प्रयोगांकडे आपला कल असला पाहीजे.
झोपेत असताना कुणीतरी छातीवर बसण्याचा भास होण्यामागची शारीरीक कारणं सन २०१५ वर्षअखेर स्पष्ट केली गेली आहेत. आतापर्यंत अमानवी वाटणारा हा प्रकार आता आपल्या समजूतीच्या आवाक्यात आला आहे. अशा हजारो अमानवी वाटणाऱ्या गोष्टींचा उलगडा करायचा तर चिकीत्सक दृष्टिकोनच पाहीजे. शरण जाण्याची अथवा लोटांगण घालण्याची वृत्ती नको.