Search This Blog

Saturday, January 2, 2016

देवाबद्दल थोडंसं.. दीर्घ!

      खूप दिवसांपासून मांडायचं होतं मला देवाबद्दल काय वाटतं ते.
     साधारणपणे सर्व धर्मांत देव ही संकल्पना आहे. त्या जोडीला आत्मा, आत्म्याला जोडून पाप, पूण्य आणि पूनर्जन्म या ही गोष्टी येतात. बौद्ध आणि जैन ही नास्तिक दर्शने परमेश्वर मानत नाहीत. पण, आत्मा-पाप-पूण्य अशा बाबींवर त्या मान्यता आधारलेल्या आहेत. यात आणखी प्रार्थना/नमाज, प्रार्थनास्थळं, उपास तापास या गोष्टींची भर घातली जाते. याला सेवा, सत्संग अशी नावं चिकटवून या सर्व पदार्थांच्या भेळीला ढोबळमानाने "अध्यात्म" म्हणतो आपण.
       याची सुरूवात कुठून झाली असेल, या विषयात खोल जाणं टाळूया. पण, उत्क्रांत होत असलेल्या माणसाला त्याच्या बुद्धीबाहेरच्या सर्व बाबींना त्याने अज्ञात अतिंद्रीय शक्तींचं लेबल लावलं आणि माणसासोबत या ही गोष्टी विकसित होत गेल्या.
     यात अलिकडचे म्हणजे चार-पाच हजार वर्षांपूर्वीचे काही जिज्ञासू मानव जाम डोकं खूपसू लागले. प्रत्यक्ष / प्रमाण/ अनुमान यांची मागणी करू लागले. यात आद्य आणि आघाडीवर होते भारतीय चार्वाक/लोकायतिक. त्यांना इतर सश्रद्ध लोक नास्तिक/ काफीर/ अॕथीस्ट म्हणू लागले.
    अगदी हल्ली, म्हणजे चार एकशे वर्षांपासून नव्या विचारधारांची संख्या वाढू लागली. वेगवेगळ्या क्षेत्रांत नवनवे विचार ओतणारे हे प्रवाह 'विज्ञान' या एका झेंड्याखाली एकवटले आणि जोमाने वाढू लागले. मानवी इंद्रीयांच्या मर्यादा यंत्रांच्या सहाय्याने धडाधड पार होवू लागल्या आणि नव्या विचारधारांमुळे अध्यात्मावर आधारीत जम बसवलेल्या विचारधारांना खतरनाक झटके बसू लागले.
    आता ही दोन शतकं (सन १९०० ते २०९९) परावर्तनाची (transformation) म्हणूनच संघर्षाची आहेत. एकीकडे दणादण हजारो वर्षांपासूनची कोडी सोडवणाऱ्या विज्ञानाचं सुप्त/प्रकट आकर्षण तर दुसरीकडे मेंदूवर पारंपारिक विचारांचा विळखा, अशा कात्रीत सापडलेल्या पिढ्यांचे आपण प्रतिनिधी. विज्ञानाची पद्धत आणि धार्मिक शिकवण यांत प्रचंड विरोधाभास आणि फार क्वचित साम्य आहे. आपण ते इवलसं साम्य गच्च पकडून अध्यात्मासोबत विज्ञानालाही मिठीत घेऊ पहातोय आणि आपली जबरदस्त फरपट होतेय.
     आता जरा 'आत्मा' पाहूया.
     आत्मा म्हणजे काय, याच्या प्रत्येक विचारधारेच्या वेगळ्या संकल्पना आहेत आणि यात भयानक गोंधळ आहे. आत्मा हे अभेद्य, अविनाशी तत्व आहे, असं सामान्यपणे मानलं जातं. पण ते नक्की कसं आहे याबाबत एकमत नाही. जैनांच्या मते आत्मा असं तत्व आहे जे शरीराच्या आकारानुसार स्वतःला लहान मोठं करतं. म्हणजे आत्मा हा शरीराच्या आकाराचा असतो. इतर काहींच्या मते आत्मा ही परमात्म्याशी जोडलेली त्याची सूक्ष्म प्रतिकृती आहे. आत्मा असतो कुठे आणि तो शरीर का आणि कधी सोडून जातो हे गणित या विचारधारांना आजवर सुटलेलं नाही. त्यामुळेच "पृथ्वीवरुन" त्याची हकालपट्टी स्वर्गात किंवा नरकात केली जाते. ज्यांचा ठावठिकाणासुद्धा आत्मा समर्थकांना माहीत नाही.
      आता माझा मेंदू असं म्हणतो, की जगणाऱ्या प्रत्येक सजीवात आत्मा आहे तर माझं शरीर ज्या अब्जावधी सजीव पेशींनी बनलेलं आहे, त्या प्रत्येकीत एक आत्मा असला पाहीजे. शिवाय, बाहेरून आत जाणारे जीवाणू विषाणू किटाणू हे ही सजीवच. मग ते आत्मे त्या अब्जावधी आत्म्यांना सामील होतात. पण, मग या अब्जावधींमध्ये माझा आत्मा कुठला? माझ्या ज्या पेशी मी लहानगं बाळ असताना नव्हत्या किंवा म्हातारपणात नसतील त्या पेशींची बेरीज वजाबाकी आत्म्यामध्ये होते? याचं उत्तर १००% कुठल्याच विचारधारेत नसणार आहे.
       कारण, असंख्य पेशींचा गोतावळा म्हणजे शरीर हे सत्य आधुनिक वैद्यकशास्त्राने लोकप्रिय केलं आहे. शरीर म्हणजेच मी. शरीर एक जैवरासायनिक यंत्र आहे जे विविध प्रकारच्या उर्जांनी व विद्युतप्रवाहांच्या प्रक्रीयेमुळे चालतं. त्याच्या महत्वाच्या यंत्रणा ढासळल्या की ते बंद पडतं. यालाच आपण "मृत्यू" म्हणतो. या स्पष्टीकरणामुळे आत्मा, परमात्मा, पाप-पुण्याच्या हिशोब आणि त्याला जोडून भूतयोनी, स्वर्ग नरक तसंच पुनर्जन्म या गोष्टी आपसूक बाद होतात. कुठलीही धार्मिक विचारधारा या स्पष्टीकरणाचं समर्थन करणार नाही.
     आता 'देव' या संकल्पनेकडे वळूया.
     देव ही संकल्पना आत्म्याच्या संकल्पनेपेक्षाही गोंधळाची आहे. खरं तर ती व्यक्तीगणिक बदलते असं म्हणता येईल. हिंदू वैदीक विचारधारेत परमात्मा किंवा नैसर्गिक शक्तींना देव मानण्याची प्रथा आहे आणि माणसांच्या मागण्या पुरवणं हे देवांचं कर्तव्यच आहे, अशीही मानसिकता आहे. यासाठी देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी यज्ञ केले जात. आजचे 'नवस' हे त्याचं बदललेलं स्वरूप. एकच परमतत्व सर्वत्र असल्याच्या भावनेमुळे कुठलाही देव कुठल्याही स्वरूपात बघता येतो. स्वामी समर्थांचं लक्ष्मीरूप, किंवा दिवाळीत कोकणात बदलले जाणारे देवतांचे मुखवटे हे याचं निदर्शक. रूप पालटण्यापासून - ते - स्वच्छता हिच देवता, देव माणसातच पहावा - इथपर्यंत या कल्पनेचा विस्तार करता येतो. हिंदू धर्माचा वैचारीक विस्तार इतरांपेक्षा कित्येक योजने प्रचंड आहे. इस्लाम आणि ख्रीश्चन धर्म एकच एक देव मानतात आणि त्यांचा देव इतरांनीही मानावा यासाठी जिहाद, क्रूसेड असे घात मार्ग अवलंबतात. त्यांच्या प्रेषितांनी दाखवलेला मार्ग हा अंतिम असतो. जैन आणि बौद्ध या भारतीय विचाराधारा देव मानत नाहीत, पण देवमाणसं (तिर्थंकर/ झेन/ गुरू)  मानतात. यातील कुठल्याच विचारधारा निर्दोष नाहीत आणि त्यांना मानणाऱ्यांच्या आचार-विचारांत प्रचंड फरक सातत्याने जाणवतो.      
      माणसांत देव पहाणाऱ्या हिंदू धर्माच्या शाखांमध्ये जातियता आणि इतर भेदाभेदांचं विष पसरलेलं आहे. इस्लाम अल्लासाठी माणसं (काफीर) मारण्याला प्रवृत्त करतो, ख्रिस्ती स्त्रीयांना जबरदस्त कमी लेखत आले. जैन आणि बौद्ध या विचारधारा इतक्या काटेकोर नियमांवर आधारीत आहेत की त्यांचं शब्दशः पालन नेहमीच्या आयुष्यात अशक्यप्राय वाटावं. असा सगळा सावळागोंधळ आहे.
       माणसाच्या आयुष्यातील अनिश्चितता देवाची मागणी करते. अडचणीच्या प्रसंगी वाटणारा भावनिक आधार म्हणजे 'देव.' सुखाच्या प्रसंगात विघ्न येऊ नये म्हणून देवाची प्रार्थना केली जाते. म्हणजेच देवांनी कशाच्या तरी बदल्यात आपलं अनिश्चित - विशेषतः दुःखदायक घटनांपासून आपलं रक्षण करावं, हा सरळसोट न्याय आहे. मग ती साधी प्रार्थना असेल किंवा यज्ञयाग. नमाज असेल वा कुर्बानी. 'देव भावाचा भुकेला' वैगरे उपमा ज्यांची देवाला भन्नाट काहीतरी भेटवस्तू चढवण्याची "आर्थिक" कुवत नाही अशांसाठी बनवलेली एक समजूत काढणारी कथा आहे.
        सुरूवातीपासूनच देव आणि मानव हा देवाणघेवाणीचा व्यवहार राहीला आहे. बहुतांश प्रार्थना आणि आरत्या/भजनांची "फलश्रूती" पाहील्यास त्यात "भौतिक मागण्या"च दिसून येतात. उदा. श्रीगणेशस्तोत्र : विद्यार्थी लभते विद्याम्, धनार्थी लभते धनम्. स्तोत्र आरत्यांमधील सूप्त 'लाभवाद' आपण फारसा लक्षात घेत नाही. स्वार्थ कुठला आणि परमार्थ काय यातला फरक अतिशय पुसट आहे. यामुळेच प्रत्येकजण त्या अर्थाला आपापल्या हिशोबाप्रमाणे वाकवू शकतो.
       देवधर्म हा एक पुरातन धंदा आणि एक अवाढव्य अर्थव्यवस्था आहे. आजच्या काळात त्याचे लाभार्थी किती आणि कोण हे आकडेवारीनिशी मांडलं पाहीजे. अमूक एका नवसाला पावणाऱ्या देवतेला एका वर्षभरात किती नवस केले जातात आणि त्यातील किती सफल होतात ते शोधल्यास या दाव्यांचा खरेखोटेपणा उघड होईल.
         हे असं वास्तव असताना- जी एक शक्ती विश्वाचं संचलन करते आहे (असं आपल्याला वाटतं) ती कोण आहे? धर्म हे त्या शक्तीशी बांधीलकी दाखवण्याचे मार्ग असतील तर त्या मार्गांचा अंतिम मुक्काम कोणता आहे? धर्म नष्ट झाले तरी ती शक्ती राहीलच असं आपल्याला वाटतं. एरवी एकमेकांवर खच्चून टिकेचा भडीमार करणारे विविध धर्मांचे अनुयायी या अदृश्य शक्तीसाठी निरीश्वरवादा विरोधात एकवटतात हे एक मजेशीर चित्र आहे.
        विश्व स्वसंचलित आहे, यात गणिती सूत्रबद्धता (Order) आणि अनाकलनीय अनिश्चितता (chaos) यांच अफलातून मिश्रण पहायला मिळतं. मुळात प्रत्येक गोष्टीला एक आदी आणि एक अंत असतो असं आपल्याला वाटणारच. कारण, आपली वाढ तशाच वातावरणात झालेली आहे. म्हणूनच विश्वाचाही कोणीतरी निर्माता असणार, त्याला आपल्या आयुष्यात ढवळाढवळ करायची आवड असणार, असं आपण गृहीत धरतो. त्याच्या भितीखातर पूजन करतो. पण, या निर्मात्याचा निर्माता कोण असा प्रश्न आपण विचारत नाही. तो अनादी अनंत आहे असं जर आपल्याला मान्य असेल तर विश्व अनादी-अनंत असायला काय हरकत आहे? असं मात्र आपण मनात आणत नाही.
देवाचं अस्तित्वच न मानणारे कित्येक लोक आयुष्य सुखात घालवतात. मग देव त्यांना मृत्यूपश्चात शिक्षा करत असेल का? निश्चितच नाही. कारण, मृत्यूपश्चात शिक्षेसाठी आत्म्यासारखं काही असावं लागेल आणि आत्मा हा प्रकारच अस्तित्वात नसतो यावर मी १००% ठाम आहे.

मग देवच नाहीय का?
याचं उत्तर द्यायला मी कचरतो. कारण, बालपणापासून आजतागायत असंख्य गोष्टी आणि भावना देव या संकल्पनेशी जोडल्या गेल्यात. देव अचानक नाकारला तर जगण्यात एक मोठी पोकळी निर्माण होईल. जी भरायला सध्या कोणतंच साधन नाही. विशेषतः माझ्यासारखा आधीचा श्रद्धावान मनुष्य एकाएकी देवाला रिटायर नाही करू शकत. पण, मी त्याच्यावर दिलेल्या जबाबदाऱ्या कमी केल्यात. हल्ली मी काहीही मागत नाही. जे मिळतंय त्याचं काही श्रेय स्वतःला आणि काही नशिबाला (अनिश्चिततेला) देतो. पण, माझ्या आईचं म्हणणं असं असतं की तू देवाला मागण्या करून त्रास देत नाहीस म्हणून तुला तो स्वतःहून देतो. मी तिचा युक्तीवाद खोडायचा प्रयत्न करत नाही. कारण, ती स्वतः प्रयत्नवादी आहे. आपलं काम आपण करायचं, निकाल देवावर सोडायचा, असा तिचा खाक्या.
       देवाशी देवाणघेवाणीचे व्यवहार संपवत आणले असले तरी इतर कुठल्यातरी शक्तीचं अस्तित्व मी सरळसरळ नाकारत नाही. आईनस्टाईनच्या सापेक्षता सिद्धांतावर झालेलं अलिकडचं संशोधन असं म्हणतं की, मिती (dimensions) आपल्याला दिसतात त्याहून जास्त असू शकतील. सजीवांच्या इंद्रीयांना मर्यादा आहेत. माणसाकडे सर्वात जास्त उत्क्रांत मेंदू असल्याने तो या मर्यादा ओळखून त्या "यंत्रांच्या" मदतीने पार करू शकतो. साधनेने अतिंद्रीय शक्ति मिळवता येतात हा दुष्प्रचार मी अजिबात मानत नाही. एखादी सजीव जमात अशी असू शकेल की त्यांना आपल्यापेक्षा जास्त मितीतील विचार करता येत असेल किंवा तसं जगता येत असेल. ('अवतार' किंवा 'इंटरस्टेलर' या हॉलीवूडपटांत या संकल्पना पुसटश्या मांडल्या गेल्यात.) पण, त्यांना माझ्या जीवनात फार रस असेल असं मला बिलकुल वाटत नाही. न्यूट्रीनोंसारखे कशालाही पार करून जाणारे मूलकण काही चमत्कारीक वाटणाऱ्या गोष्टीं घडायला हातभार लावत असतील. अशा हजारो शक्यता सांगता येतील. पण, त्यांचा उलगडा वैज्ञानिक चिकीत्सेतूनच व्हायला पाहीजे याबाबत मी आग्रही आहे.
        देव, अतिंद्रीय शक्ती अशा अदृश्य गोष्टी "विकणाऱ्या" लोकांपासून इतरांनी सावध राहीले पाहीजे.अनुभव / अनुभूती हे व्यक्तीसापेक्ष म्हणूनच बेभरवशी असतात. अनुभवांपेक्षा वारंवार सिद्ध करता येणाऱ्या प्रयोगांकडे आपला कल असला पाहीजे.
      झोपेत असताना कुणीतरी छातीवर बसण्याचा भास होण्यामागची शारीरीक कारणं सन २०१५ वर्षअखेर स्पष्ट केली गेली आहेत. आतापर्यंत अमानवी वाटणारा हा प्रकार आता आपल्या समजूतीच्या आवाक्यात आला आहे. अशा हजारो अमानवी वाटणाऱ्या गोष्टींचा उलगडा करायचा तर चिकीत्सक दृष्टिकोनच पाहीजे. शरण जाण्याची अथवा लोटांगण घालण्याची वृत्ती नको.

Wednesday, December 2, 2015

एका नवीन बापाचं आशादायी पत्र.

प्रीन्सीला आणि मला, आमची मुलगी 'मॕक्स' हीचं या जगात स्वागत करण्यास फार आनंद होत आहे.

तिच्या जन्माच्या निमित्ताने, आम्ही ती ज्या प्रकारच्या जगात मोठी व्हावी अशी अपेक्षा आम्ही करतोय त्याबद्दल तिला एक पत्र लिहिले आहे.

हे एक असं जग आहे जिथे आमची पिढी-- आजारांवर उपचार शोधून, प्रत्येकाच्या आवडीनुसार/कुवतीनुसार शिक्षण देऊन, प्रदुषण न करणाऱ्या उर्जास्रोतांच्या वापरातून, लोकांमधील सुसंवाद वाढवून, मजबूत समाज निर्माण करून, गरीबी कमी करून, सर्वाना समान अधिकार देवून आणि राष्ट्रा-राष्ट्रांमधिल समंजसपणा वाढवून - मानवी क्षमता आणि समता यांचा विकास करू शकते.

आम्ही हे जग सर्व लहान मुलांसाठी सुखद बनवण्यासाठी आमचं छोटसं योगदान देण्यास कटीबद्ध आहोत. आमच्या पुढील आयुष्यात, आम्ही 'फेसबूक' मधील आमचे ९९% समभाग (शेअर्स) ज्यांची आजघडीची किंमत ४५ बीलीयन डॉलर्स (साधारणतः २.९९ लाख कोटी रुपये) इतकी आहे, ते इतरांच्या सहकार्यांने जगाच्या उत्कर्षासाठी  देण्याचे निश्चित केलं आहे.

प्रीन्सीलाच्या गर्भावस्थेदरम्यान दिलेल्या प्रेम आणि आधाराकरीता या समुदायातील सर्वांना धन्यवाद. आपण सर्वांनी आमच्या मनात आपण मॕक्स आणि सर्व मुलांसाठी हे जग एकत्र येवून घडवू शकतो अशी आशा निर्माण केली आहे.

:::::::::::::::::

लाडक्या मॕक्सला,
       तू (तुझ्या येण्यामुळे) आम्हाला भविष्याबद्दल जी आशा दाखवली आहेस, तिचं वर्णन करण्यासाठी तुझ्या आईकडे आणि माझ्याकडे अजूनही शब्द नाहीत. तुझं भवितव्य निश्चित उज्वल आहे, आणि आमची अशी सदीच्छा आहे की तू निरोगी व सुदृढ व्हावंस जेणेकरून ते आशादायक आयुष्य तुला छानपैकी उलगडता यावं. तू ज्या प्रकारच्या जगात जगावं, असं आम्हाला वाटतं त्यावर विचार करण्याचं कारण तू आधीच आम्हाला दिलं आहेस.
       इतर सर्व पालकांप्रमाणे आम्हालाही वाटतं की तू आज आमचं जे जग आहे त्यापेक्षा सुधारीत जगात जगावं.
       बातम्यांचे मथळे जगात काय चूकीचं चाललं आहे यावर जास्त लक्ष देत असले, तरीही कितीतरी बाबतीत जग चांगलं बनत आहे. आरोग्यमान सुधारतंय. गरीबी आक्रसतेय. ज्ञानभंडारात वाढ होतेय. लोकं जोडली जात आहेत. प्रत्येक क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा प्रगतीचा अर्थ असा आहे की तुझं आयुष्य आमच्या आजच्या जगण्यापेक्षा कितीतरी पटींनी सुखकर असेल.
      यासाठी आम्ही फक्त तुझ्यावर असलेल्या प्रेमापोटी आमचं योगदान देणार नाही, तर जगातील पुढे येणाऱ्या पिढ्यांप्रती एक नैतिक जबाबदारीही आम्हाला पार पाडायची आहे.
       प्रत्येकच जीव मोलाचा आहे, असे आम्ही मानतो आणि त्यात भविष्यकाळात आजपेक्षा कितीतरी जास्त असणाऱ्या जीवांचा (लोकसंख्येचा)ही समावेश होतो. आजच्या वैश्विक समाजाची ही जबाबदारीच आहे की आपण आज जे जीव जगत आहेत त्यांच्याइतकंच भविष्यात वाढ होणाऱ्या जीवांचं आयुष्य समृद्ध करण्यासाठी विचारपूर्वक गुंतवणूक करावी.
        पण आजघडीला आपण सारे स्रोत तुमच्या पिढीसाठीच्या संधी आणि अडचणींकडे एकत्रितपणे थेट वळवत नाही आहोत.की येत्या काही महीन्यात देऊच        जसं की, आजार/रोग. आज आपण आजारीच पडू नये, यासाठी केल्या जाणाऱ्या संशोधनांपेक्षा ५० पट जास्त खर्च आजारी माणसांच्या उपचारांसाठी जास्त महत्व देऊन करतो.
       औषधे आणि वैद्यकशास्त्र हे खऱ्या अर्थाने विज्ञान म्हणून गेल्या केवळ शंभर वर्षात पुढं आलं आहे आणि या छोटाश्या काळातच आपण काही रोगांवर पूर्ण विजय मिळवला आणि काही आजारांवर बऱ्यापैकी उपचार शोधले.
      येत्या शंभर वर्षात तंत्रज्ञानाच्या वेगवान प्रगतीमुळे आपण सर्व किंवा बहुतांश आजार रोखणे, बरे करणे किंवा त्यांचं व्यवस्थापन करणे यात यश मिळवलेलं असेल.
      सध्या बरेचसे नागरीक - हृदयविकार, कर्करोग , मेंदूचे विकार, मेंदूवरील आघात आणि संसर्गजन्य रोग या पाच आजारांमुळे मरण पावतात आणि यावर तसेच इतर आव्हानांवर आपण अतिशय वेगाने मार्ग काढू शकतो.
      एकदा का तुझ्या आणि तुझ्या मुलांच्या पिढीला या आजारांचा उपद्रव होवू नये , याची जाणिव झाली की आमच्या पिढीचं हे कर्तव्यच आहे - भविष्याचा विचार करून हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सारी गुंतवणूक या बाजूला वळवावी. तुझी आई आणि मी यात आमचं योगदान देऊ इच्छितो.
       आजारांवर उपचार करण्यात वेळ खूप जातो. पाच किंवा दहा वर्षांच्या छोट्याशा काळात आपण फार काही मिळवलं असं दिसणार नाहीय. पण एका मोठ्या काळानंतर आपल्या प्रयत्नांना फळं येतील आणि एक दिवस, तुम्ही किंवा तुमची मुलं ते वास्तव पाहू शकता ज्याची आम्ही केवळ कल्पनाच करू शकतो : आजारांच्या त्रासापासून मुक्त असलेलं जग!
       या शक्यतेसारख्या इतरही काही संधी आहेत. जर आजच्या समाजाने आपली बहुतेक ताकद या मोठ्या अडचणींविरोधात एकवटली, तर आम्ही तुमच्या पिढीसाठी एक आरामदायी जग मागे सोडून जाऊ.

°°°
    तुमच्या पिढीसाठीच्या आमच्या सदीच्छा दोन मुख्य संकल्पनांवर केंद्रीत आहेत : मानवी क्षमतांची प्रगती आणि समतेचा पुरस्कार.

मानवी क्षमतांची प्रगती म्हणजे मानवी जीवन किती भव्य होऊ शकतं यावरील मर्यादा दूर करण्याचा प्रयत्न.

तुम्ही आमच्याहून १०० पट अधिक गोष्टी शिकू व अनुभवू शकता का?

आमची पिढी आजारांवर उपचार शोधू शकेल का जेणेकरून तुम्ही अधिक निरोगी व दीर्घायुष्य जगू शकाल?

आम्ही हे जग अशा पद्धतीने जोडू शकतो का, की प्रत्येक कल्पना, माणूस आणि संधीपर्यंत पोहोचता येईल?

आम्ही अधिकाधिक प्रदुषणविरहीत उर्जा मिळवू शकतो का ज्यामुळे आम्हाला पर्यावरणाच्या काळजीपोटी ज्या गोष्टींवर संशोधन करता येत नाही ते तुम्ही करू शकाल?

आम्ही उद्योजकतेला अशा प्रकारे चालना देवू शकतो का की जागतिक शांतता व समृद्धी वाढवण्यासाठी तुम्ही कोणताही उद्योग उभारू शकता व कोणतीही कोडी सोडवू शकता?

समतेचा पुरस्कार म्हणजे प्रत्येकाला या संधी उपलब्ध असल्या पाहीजेत - ज्यात त्याचा देश, नागरीकत्व , कुटूंब किंवा परीस्थितीचा कोणताही अडसर येता कामा नये.

समाजाने हे काम फक्त न्यायासाठी किंवा दान म्हणून न करता मानवी प्रगतीच्या उदात्त हेतूसाठीच केलं पाहीजे.

आज आपण कितीतरी जणांच्या जबरदस्त क्षमतांना मुकतो आहोत. या क्षमता वापरण्याचा एकमेव मार्ग म्हणजे प्रत्येकाची ती नैसर्गिक हुशारी, संकल्पना आणि वैयक्तिक मेहनत यांना नीट रस्ता दाखवणं.

आमची पिढी गरीबी आणि उपासमारी नष्ट करू शकते का?

प्रत्येकाला मुलभूत आरोग्य सेवा देणं आम्हाला शक्य आहे का?

आम्ही समंजस आणि खेळीमेळीने रहाणारे समाज बांधू शकतो का?

विविध राष्ट्रांतील नागरीकांमध्ये आम्हाला शांतताप्रिय आणि समजूतदार नातेसंबंध जोडता येतील का?

स्त्रीया, मुले, आदिवासी व विस्थापित अशा सर्वांना आम्ही स्वावलंबनाची ताकद पुरवू शकतो का?

जर आमच्या पिढीने गुंतवणूकीसाठी सुजाण निर्णय घेतले तर या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सकारात्मक आहे-- आशा करूया की तुमच्याच जीवनकाळात.

°°°°°
हे ध्येय : मानवी क्षमतांची प्रगती आणि समतेचा पुरस्कार - या ध्येयाप्रती सर्वांनीच काम करण्याची नवी मानसिकता गरजेची आहे.

आम्ही खूप मोठ्या काळासाठी ; २५, ५० किंवा बहुदा १०० वर्षांसाठी गुंतवणूक केली पाहीजे. सर्वात मोठी आव्हानं मोठ्या काळाच्या क्षितीजावरच संपू शकतात आणि त्यांना लहानसहान विचारांनी भिडता येणार नाही.

आम्हाला ज्यांची सेवा करायची आहे त्यांच्याशी आम्ही थेट मिसळलं पाहीजे. आम्हाला त्यांच्या आकांक्षा व गरजा समजल्या नाहीत तर त्यांना योग्य ती ताकद देणे कदापि शक्य होणार नाही.

आम्ही आश्वासक बदल घडवून आणणारं तंत्रज्ञान उभारलं पाहीजे.  कित्येक मंडळं यात पैसा ओततात पण बहुतेकदा प्रगती ही सृजनशील कामांच्या प्रभावामुळे होते.

आम्ही धोरणं आखणं आणि उपयुक्त वाद-संवाद करणं यात सहभाग वाढवला पाहीजे. कित्येक संघटनांना हे मान्य होणार नाही पण प्रगती ही शाश्वत काळ टिकण्यासाठीच्या चळवळींवर आधारलेली हवी.

आपण त्या-त्या क्षेत्रातील सर्वात सशक्त आणि स्वतंत्र बुद्धीच्या नेतृत्वाला पाठबळ दिलं पाहीजे. ध्येय गाठण्यासाठी तज्ञांशी भागिदारी करणं हे एकट्यानंच वाटचाल करण्यापेक्षा फार प्रभावी आहे.

उद्यासाठी उपयोगी गोष्टी शिकण्यासाठी आपल्याला आज जोखीमीची कामं करणं भाग आहे. आपण नुकतंच शिकू लागलो आहोत आणि आपण मेहनत केलेल्या कित्येक गोष्टी घडत नाहीत, तरीही आपण ऐकूया, शिकूया आणि शहाणे होऊ या.

°°°°
आमचं वैयक्तिक शिक्षण, इंटरनेटचा वापर, सामाजिक शालेय शिक्षण आणि आरोग्य याबाबतचे अनुभव यांवर आमचं तत्वचिंतन उभं राहीलंय.

आमची पिढी शाळेच्या वर्गांतून वाढली जिथे आमच्या आवडी-निवडी आणि कुवत यांचा विचार न होत्या सारख्याच गोष्टी एकसारख्याच वेगाने शिकवल्या गेल्यात.

आमची पिढी तुम्हाला काय बनायचं आहे ते जाणून त्याप्रमाणे ते ध्येय ठरवेल- जसं की इंजीनीयर, आरोग्य सेवक, लेखक की सामाजिक नेता. तुमच्यापाशी ते तंत्रज्ञान उपलब्ध असेल जे तुम्ही कोणत्या पद्धतीने चांगलं शिकू शकता आणि तुम्ही कुठे लक्ष देण्याची गरज आहे ते समजून घेईल. तुमच्या सर्वात आवडीच्या विषयांमध्ये तुम्ही पटकन गती पकडाल आणि तुम्हाला गरजेचं वाटेल त्या भागासाठी तुम्हाला हवी तितकी मदत मिळेल. आज ते शाळा-कॉलेजात उपलब्ध ही नाहीत, असे विषय तुम्ही अभ्यासणार आहात. तुमच्या ठरवलेल्या ध्येयाकडे घेऊन जाण्यासाठी तुमच्या शिक्षकांकडे अधिक चांगल्या सुविधा आणि दर्जेदार माहीतीचा साठा असणार आहे

याहून भारी म्हणजे, जरी एखाद्या चांगल्या शाळेपाशी नसले तरीही, जगभरातील विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक पातळीवर शिक्षण सोपं करणाऱ्या इंटरनेटवर आधारीत उपकरणांचा आधार असणार आहे. अर्थातच, प्रत्येकाला आयुष्यात योग्य सुरुवात मिळण्यासाठी तंत्रज्ञानाहून कितीतरी अधिक गोष्टींची गरज आहे. पण, वैयक्तिक शिकवण हा एक प्रत्येक बाळाला उत्तम शिक्षण आणि अधिक समान संधी मिळवून देण्याचा एक श्रेयस्कर मार्ग आहे.

आम्ही हे तंत्रज्ञान बांधायला नुकती सुरुवात करतो आहोत आणि निकाल फार आशादायक आहेत. विद्यार्थी फक्त परीक्षांमध्येच चांगले गुण प्राप्त करत नाहीयत तर ते त्यांना जे शिकायचं आहे त्या दृष्टीने कौशल्य आणि आत्मविश्वासही मिळवत आहेत. आणि ही फक्त प्रवासाची सुरूवात आहे. तू शाळेत जाऊ लागशील तेव्हा तंत्रज्ञान आणि शिकवण्याच्या पद्धती   दरवर्षी झपाट्याने प्रगती करतील.

तुझ्या आईने आणि मी दोघांनीही शिक्षक म्हणून काम केलेलं आहे आणि हे सर्व घडून येण्यासाठी काय लागतं याची आम्हाला जाणिव आहे. वैयक्तिक शिकवणीचा जगभरातील शाळांमध्ये प्रसार होण्यासाठी आम्हाला ताकदवान शैक्षणिक तज्ञांची सोबत लागेल. समाजामध्ये मिसळावं लागेल ज्याची सुरूवात आम्ही आपल्या सॕनफ्रॕन्सीस्को बे एरीयातून करत आहोत. यासाठी नवं तंत्रज्ञान आणि नव्या संकल्पना घडवाव्या लागतील. आणि यासाठी चूका कराव्या लागतील आणि चूकांपासून धडे घेत आपल्या ध्येयाकडे जावं लागेल.

एकदा का आम्हाला समजलं की आम्हाला तुमच्या पिढीसाठी कशा प्रकारचं जग बनवायचं आहे, नंतर आमची एक समाज म्हणून ही जबाबदारीच आहे की या ध्येयाशी सुसंगत गुंतवणूक करणे.

सामुदायिकरित्या , आम्ही हे करू शकतो. आणि आम्ही जेव्हा हे करू, वैयक्तिक शिक्षण हे फक्त चांगल्या शाळांमधील मुलांपुरतं उपयोगी न राहता , इंटरनेट वापरणाऱ्या प्रत्येकासाठी समान संधी उपलब्ध करून देणारं असेल.

°°°°
फक्त तंत्रज्ञानाने प्रश्न सुटणार नाहीत. एक सुखकर जग बनवण्याची सुरूवात निरोगी आणि सशक्त समुदाय बांधण्यातून होते.

मुलांना सर्वांगिण शिक्षणातून चांगल्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतात. आणि ते तेव्हाच चांगलं शिकतात जेव्हा त्यांची तब्बेत सुदृढ असते.

आरोग्याची सुरूवात लवकर होते -- प्रेमळ कुटूंबासोबत, सकस आहार, आणि स्थिर, सुरक्षित वातावरणात..

लहान वयात धक्कादायक अनुभवांना सामोरं गेलेल्या मुलांची बौद्धिक व शारीरीक वाढ खुंटते. संशोधनांतून असं समोर आलंय की मेंदूच्या वाढीतील बदलांमुळे शिकण्याच्या कुवतीवर विपरीत परीणाम होतो.

तुझी आई एक डॉक्टर आणि शिक्षीका आहे. तिने हे सर्व पाहीलेलं आहे.

जर तुम्ही घरभाडं की जेवण या विवंचनेत असाल, किंवा शोषण आणि गुन्ह्यांबाबत भयभीत असाल, तर तुम्हाला तुमची पूर्ण क्षमता वापरणं शक्यता होत नाही.

जर तुम्हाला भिती वाटत असेल की तुमच्या शरीराच्या रंगामुळे तुम्ही कॉलेजऐवजी तुरुंगात जाल, किंवा तुमच्या (नागरीकत्वाच्या) कायदेशीर वैधतेमुळे तुमच्या कुटूंबाला हाकललं जाईल, किंवा तुमच्या धर्मामुळे, लैंगिकतेमुळे तुम्हाला हिंसेला बळी पडावं लागेल.. तर तुम्हाला तुमचं ज्ञान वापरणं अवघड होतं.

आपल्याला हा सर्व गुंता समजून काम करणाऱ्या संस्थांची गरज आहे. तुझी आई जी नव्या प्रकारची शाळा साकारतेय तिचा हा तात्विक पाया आहे.

शाळा, आरोग्य सुविधाकेंद्रे, पालक समूह आणि स्थानिक प्रशासनांशी भागिदारी करून आणि सर्व लहान मुलांना सकस आहार मिळतो आहे , त्यांना वात्सल्यभावनेनं वाढवलं जातं आहे याची खात्री करून, आपण हे सर्व काम जोडलेलंच आहे असं मानू शकतो. तेव्हाच आपण सर्वांना समान संधी देण्याची एकसंध सुरूवात केली असं म्हणू शकू.

या प्रारूपाला संपूर्णपणे कार्यान्वीत करायला कित्येक वर्ष लागतील. हे एक अजून उदाहरण आहे की , कशा पद्धतीने संपूर्ण मानवी क्षमतेचा वापर करणं आणि समान संधी मिळणं एकमेकांशी घट्ट बांधलेले आहेत. आपल्याला यापैकी काही साध्य करायचं तर आपण आधी सर्वसमावेशक आणि निरोगी सशक्त समुदाय निर्माण केले पाहीजेत.
°°°°°
तुमची पिढी एका सुधारीत जगात जगावी म्हणून आमच्या पिढीने करण्यासारखं फार काही आहे.

आज, तुझी आई आणि मी, आमचं आयुष्य या आव्हानांवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने आमचं योगदान देण्यासाठी खर्च करू अशी शपथ घेतो. मी फेसबूकचा मुख्याधिकारी (CEO) म्हणून येती खूप वर्ष काम करणार आहे, पण हे इतके महत्वाचे मुद्दे आहेत की तू किंवा आपण अजून मोठे होऊन काम करेपर्यंत थांबणं शक्यच नाही. आमच्या तरूणवयात काम सुरू करण्याने त्याचे दृश्य परीणाम पाहता येतील, अशी आम्हाला आशा आहे.

तू चॕन-झूकरबर्ग घराण्यांची नवीन पिढी सुरू केली असल्याने आम्हीही इतरांच्या सोबतीने येणाऱ्या पिढ्यांसाठी क्षमता विकास आणि समता स्थापन करण्यासाठी 'चॕन झूकरबर्ग इनीशीएटीव्ह' सुरू करत आहोत. सुरूवातीला आमचं लक्ष वैयक्तिक शिकवणी, आजारांवर उपचार, लोकसहभाग आणि सशक्त समाजबांधणी यावर केंद्रित असणार आहे.

आम्ही आमचे फेसबूकमधील ९९% समभाग या कामासाठी आमच्या आयुष्यभरात देणार आहोत. आम्हाला माहीती आहे, जे या कामासाठी आधीपासूनच योगदान व स्त्रोत देत आहेत त्या तुलनेत ही रक्कम छोटी आहे. पण, इतरांच्या सोबत आम्ही या ध्येयासाठी जे काही करू शकतो ते करू इच्छितो.

याबाबतचे तपशील आम्ही एकदा आमच्या नविन कौटुंबिक आयुष्याचा जम बसल्यावर आणि आमच्या पालकत्वाची सुटी संपल्यानंतर येत्या काही महीन्यात देऊच. आम्हाला माहीत आहे, आम्ही हे सर्व का करतोय आणि कशा पद्धतीने करणार आहोत याबाबत तुमच्या मनात अनेक प्रश्न आहेत.

आम्ही आमच्या पालकत्वाद्वारे आयुष्याच्या एका नव्या पैलूला सामोरं जातानाच या सर्वात आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत.

आम्ही हे करु शकतो कारण आमच्या मागे जागतिक  जनसमूदायाची एक प्रचंड ताकद उभी आहे. फेसबुकमुळे हे जग नव्या पिढ्यासाठी सुधारण्याचे असंख्य स्त्रोत निर्माण झालेत. फेसबुकवरील प्रत्येक सदस्य यात आपलं योगदान देत आहे.

आम्ही या संधीकडे वाटचाल करू शकतो कारण आम्ही आमच्या मार्गदर्शकांनी, तज्ञांनी, गुंतवणूकदारांनी आणि इतर कित्येक जबरदस्त व्यक्तींनी दिलेल्या योगदानाच्या भक्कम पायावर उभे आहोत.

आणि आम्ही या जनसेवेच्या व्रताला हात घालू शकतोय कारण आमच्या सोबत असलेले आमचे प्रेमळ कुटूंबिय, आधार देणारे मित्र आणि अजोड सहकारी. आम्हाला विश्वास आहे असे सखोल आणि प्रेरणादायी नातेसंबंध तुलाही तुझ्या जीवनात मिळतील.

मॕक्स, आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि आमची एक भव्य जबाबदारी आहे की तुझ्यासाठी आणि इतर सर्व मुलांसाठी एक छान जग पाठी सोडून जावं. तू आम्हाला दिलेल्या प्रेम, आशा आणि आनंदाइतकंच सर्वकाही तुलाही मिळो अशी, आम्ही सदीच्छा करतो. तू या जगाला काय देतेस ते पाहण्यासाठी आम्ही अगदी आतूर की येत्या काही महीन्यात देऊच.

तुझेच,
आई आणि बाबा.

Thursday, November 26, 2015

लेटर्स टू अ यंग सायंटिस्ट : अनुवादीत पुस्तकावर टिपणी.

        रिनर मारीया रिल्के या सुप्रसिद्ध जर्मन कवीने त्याचा शिष्य फ्रँझ कापुस्स याला काव्यनिर्मिती, सर्जनशिलता याबाबत दहा पत्रांद्वारे जे अनमोल मार्गदर्शन केलं ते "लेटर्स टू अ यंग पोएट" या नावाने जागतिक साहीत्यात दर्जेदार कलाकृतीत (world classics) समाविष्ट झालं. अशाच शिर्षाखाली अनेक प्रकारची पुस्तकं नंतरच्या काळात निघाली. त्यापैकीच एक डॉ. एडवर्ड ओ. विल्सन यांचं "लेटर्स टू अ यंग सायंटिस्ट".
         डॉ. विल्सन यांनी एक कुणी विशिष्ट व्यक्तीला संबोधून ही मार्गदर्शनपर पत्रं लिहीण्याऐवजी जगात प्रत्येकात लपलेल्या एका संशोधकाला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुठल्याही क्षेत्रात आपला आयुष्याचा मार्ग शोधणाऱ्या व्यक्तीला जशा अडचणीं असतात तशाच त्या एका संशोधकाला/ शास्त्रज्ञालाही असतात. वाढत्या वयात घरातून, आजूबाजूच्या सामाजिक-आर्थिक-राजकीय परीस्थितीतून आपल्यावर संस्कार होत असतात. काही गोष्टी आपण स्वतःहून शिकत असतो. तसाच लहानगा एडवर्ड घराच्या आजूबाजूच्या परीसरात हिंडताना किटक, फूलपाखरं यांच्या प्रेमात पडला. कधी कुठले समूह जंगलात फिरायला नेणारा वाटाड्या , कधी सर्प प्रदर्शन भरवणारा एक किशोरवयीन मार्गदर्शक असे प्रकार करत एडवर्ड "हार्वर्ड" या जगविख्यात विद्यापिठात पदवी मिळवण्यासाठी दाखल झाला आणि पुढे याच विद्यापिठात "evolutionary biology" उत्क्रांती जैवशास्त्र या नव्याच विद्याशाखेचा जन्मदाता बनला. 

        हा सर्व प्रवास जितका खडतर आणि मोठा आहे  तितकाच रोमांचकही. या साठ वर्षांच्या प्रदीर्घ धावपळीनंतर आलेले अनुभव डॉ. विल्सन आपल्यासमोर मांडतात. जगाला एखाद्या विषयातील मुलभूत ज्ञान पुरवणारा एक संशोधक कसा तयार होतो, याचं झकास वर्णन या पुस्तकात आहे.
"मुंग्या" या विषयावर एखादा माणूस आयुष्य खर्च करू शकतो हेच आधी आपल्या भारतीय मेंदूला झेपणारे नाही. आपलं घर, संसार आणि वैयक्तिक आयुष्य जपत आठवड्याचे साठ तास काम करणं ही एक भयानक कसरत आहे, असं मान्य करतानाच वैयक्तिक व व्यावसायिक नातेसंबंध कुणाशी व किती जपायचे यावरही डॉ. विल्सन भाष्य करतात.
        लहानग्या एडवर्डच्या बाबतीत सर्वात भारी काय वाटलं असेल तर ते त्याला त्याच्या आवडीनुसार जगण्याचं मिळालेलं स्वातंत्र्य. भले ते पालकांच्या काहीशा दुर्लक्षपणानं असेल पण एडवर्डला कुठलेही क्लास, ट्युशन्स छंदवर्गांना जावं लागत नसे. कुठल्या काका, मामा, मावश्यांकडे जावं लागत नसे. सुटी व फावला वेळ एडवर्ड फुलपाखरांच्या मागे धावण्यात व त्यांचा काही प्रसिद्ध पुस्तकांतून अभ्यास करण्यात घालवत असे. फुलपाखरं व किटक पकडणे त्यांच्या नोंदी ठेवणे हे उद्योग तो आपसुक शिकला.
       "जिथे गर्दी कमी, तिथे मी" या न्यायाने एडवर्ड 'मुंगी' या विषयावर मुलभूत संशोधन करू लागला आणि अल्पावधीतच त्यातील तज्ञ म्हणून मान्यता पावला. कळपाची मानसिकता धुडकावून वेगळ्या वाटेने जाणाऱ्यांचं यश आणि अपयशही अगदी खास असतं. 'नेचर' आणि 'सायन्स' या दिग्गज नियतकालीकात अपयशी प्रयोगांबाबत प्रसिद्ध झालेल्या मोजक्या शोधनिबंधात एडवर्डचा एक निबंध होता. जो प्रयोग नंतर एका शास्त्रज्ञाने बऱ्याच खटपटींनी सिद्ध केला.
जंगलं हीच प्रयोगशाळा असं मानणाऱ्या एडवर्डला दक्षिण अमेरीकेला त्रास देणाऱ्या 'आग्या' मुंग्यावर उपाय शोधायचा होता. तेव्हा प्रयोगासाठी जमा केलेल्या मुंग्यांनी त्याचे हात फोडून काढले होते. अशा अनेक करामतींच्या उदाहरणांनी डॉ. विल्सन संशोधनाचा प्रवास आपल्याला सांगतात.
        

माधुरी शानभाग यांनी या उत्कृष्ट मार्गदर्शनपर पुस्तकाचा तितकास शानदार मराठी अनुवाद केला आहे. फक्त विज्ञानाऐवजी सायन्स या शब्दाचा अतिरीक्त वापर खटकतो.
राजहंस प्रकाशन या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या अनुवादीत पुस्तकात एकूण १७४ पाने असून किंमत रु. २०० इतकी आहे.


Tuesday, November 24, 2015

अमिर खान कुटूंबियांचे स्थलांंतर: एक अ-सरकारी अहवाल.

      अमिर खान या प्रसिद्ध सिनेनटाच्या पत्नी सौ. किरण राव खान यांना देशातील कथित असुरक्षित वातावरणाबाबत वाटत असलेल्या भितीबाबत सदर विभागाने एक व्यापक मत-सर्वेक्षण केले. त्याबाबतचा गोपनीय अहवाल पुढीलप्रमाणे.

१. श्री. सर्वज्ञ पूणेकर. (पूणे)
      "याबाबतीत मला असं म्हणायचैय की कसं आहे. प्रत्येकाची बायको कधी कधी बारीकसारीक तक्रारी करते. पण अशावेळी त्याकडे किती लक्ष द्यायचं ते नवऱ्याने आपल्या कुवतीने ठरवायचं असतं. आता आमच्या लौकीकला - माझ्या मुलाला चांगली शाळा मिळावी म्हणून आम्ही देहूरोडहून पिंपरीत येऊन स्थायिक झालो.
      पण हा कसा सामान्य विषयै. सध्या जगभरातील राजकीय सामाजिक व्यवस्था ही "राष्ट्रराज्य" संकल्पनेवर आधारीतै. अशावेळी देश सोडायच्या वार्तांमुळे वादंग उठणं स्वाभाविकच. त्यात मुलांच्या भवितव्याविषयी देशातील असुरक्षितता हे कारण देणं फारच आक्षेपार्ह. आता अमिर देश सोडून समजा अमेरीकेत गेला तर मुलाचं भवितव्य सुरक्षित नी अमिर बेरोजगार. तिथे हॉलीवूडला स्थिरावायला तो काही इरफान खानइतका कसदार अभिनेता नव्हे. काय? समजलं ना?"

२. अजीत मुंबईकर ( ठाणे)
       मायला बायकांना किती काय आणून द्या. सदाची किटकिट डोक्याला. अॉफीसं लांब पडतात म्हणून आम्ही आता बदलापूरवरून ठाण्यात आलो. इथं घराचे हप्ते भरताना बोच्याची सालं निघतायत आणि बायकोला पोरांना इंटरनॕशनल बोर्डाच्या शाळेत घालायचंय. काय तर म्हणे पोरांच्या भविष्याचा विचार करतेय. अरे, आम्ही गावाकडच्या मराठी शाळेत शिकूनच मोठे झालो ना? इंटरनॕशनल स्कूल बील निव्वळ लुटमारीचे धंदे करतात चुतमारीचे. काय अर्थ नाय त्याला. अमिर शाना असेल तर बायकोच्या नसत्या भूणभूणीकडे दुर्लक्ष करेल. नायतर मेला कर्मानं.

३. हिम्मतराव कोल्हापूरे-पाटील (अध्यक्ष : रंकाळ्याकडील तालीम मंडळ)
       "आरंs अमिऱ्याss गांड्याsss.. मर्दा, तू आसताना कारभारनीला भ्या वाटायं लागलं तं तू काय कामाचा? मायला, आमच्या बायका आमी नसताना वाघीनीवानी येकट्या ऱ्हात्यात शेतावरल्या घरात. तुमाला फूल्ल शेकूरीटी आसताना बी भ्या वाटतंय व्हय रं..?"

४. सदानंद कोकणे.
        आमची ही पन लय काय-काय मागते. पन तेस खरा काय हवा ता माज अचूक कळता. वाराला चार चांगलं मासं आनलं की आटवडाभर गडबड नाय. हितं तसा बगायस गेलंव तर कोनाचाच भविष्य सुरक्षित नव्हता. सगळी मंडळी मुंबय पून्यास नी खंय खंय नोकरी धंद्यास पलाली. कोकन तसा या पलायनाने वस (ओस) पडाचा. पन काय-काय जिद्दी लोका हितं जमंल तसा आंंब्या कोकमाचा उत्पन्न काडून जगलीत. आता जरा बरे दिवस येतंताय. पोरा सोरा मिलून एकत्र येवंन सामुदायिक शेतीचे प्रयोग करतंत हाय. मश्यशेती (मत्स्य शेती) करतंत हाय. हितं पन सगळ्यांचा भविष्य सुरक्षित होयल. नाय! आमी करनार!! जेंका पलायचा आसंल ते पलतील. जे यतील त्यांच्यासोबत, नाय.. त्यांच्या शिवाय.. !कोकण समृद्ध होनार!

५. फातीमाआपा (भायखळा, मध्य मुंबई)
     वो पैले मई वो फोरास रोड के एरया में रैती थी.. वैसे वो एरयेके पैलेसे रैनेवाले लोगोंको कुच धोखा नै हे. पर लडकीयाँ बडी हो रयी हे. फालतू में रीक्स कौन लेंगा. मैं इदर दगडी चॉल के इदर एक छोटासा रूम ली.. वैसे लडकी को किदर भी धोखाच रैता हे. रस्तेपे, इस्कूल में, किलास (ट्यूशन) में, यआ तककी घर में भी.. अमिर पैसेवाला हे, उसको तो इन्कमटॕक्स से लेके बच्चे अगवा करनेवाले गँग तक सबका डर रहेंगा. वैसे अपना देस इत्ता बुरा नै. वो अमरीकामें दो चार वारी सुना हे बच्चेच इस्कूल में फायरींग करके भोत लोगोंको मार डाला. जा भई, तेरे पास पैसा हे , तू किदर बी जा.. डर किसीका पिछा नै छोडता.

६. ओमकार गिरकर (स्थलांतराच्या जागतिक घडामोडींचे अभ्यासक)
       अमिरच्या या देश सोडण्याच्या वक्तव्याकडे स्थलांतराच्या सामान्य घटनेसारखे पाहणे निश्चित शक्य आहे. पण, यामागची जी मानसिकता आहे किंवा त्यामागची जी कारणं आहेत, तसंच त्याच्या संभाव्य परीणामांविषयी स्थलांतर करण्यास इच्छूक माणसांनी काय विचार केला आहे, हे जाणून घेणे महत्वाचे आहे. स्थलांतरामागे जगण्याच्या सुरक्षित आणि अधिक उन्नत पातळीवरील संधी याविषयी भ्रामक किंवा वास्तव कल्पना असू शकतात.. आणि याला कुणीही अपवाद नाही. अगदी अमिरखान सारखा श्रीमंत आणि लोकप्रिय व्यक्तीसुद्धा!
       कोकणातून, उर्वरीत महाराष्ट्रातून तरूण नोकरीच्या शोधात मुंबईत येत असतात. उत्तर भारतातून मुंबईवर बेरोजगारांचे लोंढे आदळत असतात. त्यापेक्षा मोठं चित्र पहायचं तर भारतातून उच्च शिक्षणासाठी आणि चांगल्या पगाराच्या नोकऱ्यांच्या शोधात शेकडो जण दरवर्षी विकसित देशात जातात. तिथलं नागरीकत्व मिळवण्याचा प्रयत्न करतात. याविरोधातही 'ब्रेन ड्रेन' थांबवा असा आवाज उठतो पण तो नगण्य असतो. साधारणतः मध्यम व कनिष्ठ आर्थिक स्तरातील भारतीय नागरीकांच्या मते अमिर सामाजिक-आर्थिक दृष्ट्या प्रचंडच बलशाली आहे. परंतु, माणसाला कुठल्याही स्तरावर भितीपासून मुक्तता नसते. कोणत्या ना कोणत्या प्रकारची भिती ही प्रत्येकालाच सतावते.
       किरण राव बाईंनी आपल्या स्थलांतराच्या बेतामागचं कारण सांगितलं नसतं किंवा अमिर खानने ते माध्यमांसमोर जाहीर केलं नसतं तर ही स्थलांतराची एक सामान्य बाब बनून राहीली असती. अमिरच्या वक्तव्याला राष्ट्राप्रती अविश्वासाचा वास येत असल्याने वादंग निर्माण झाला आहे.
       प्रत्येक पातळीवरील सरकार किंवा राजकीय यंत्रणा सर्वच नागरीकांच्या वैयक्तिक आशा आकांक्षा पूर्ण करण्यात कधीच पुरेसं पडत नाही. कधीकधी परीस्थिती बिकट होते. पण, परीस्थिती सुधारण्यासाठी पुढाकार घ्यायचा त्यांच्याकडून अशी विधानं येणं खरंच दुर्देवी आहे. या परीस्थितीत समाजोपयोगी काम करण्यासाठी नाना पाटेकर हे चित्रपटकर्मींना आदर्श ठरावेत.

Tuesday, October 27, 2015

विज्ञान विरूद्ध समाज.

       २०१५ च्या जूलै महीनाअखेर चित्रपटगृहांमध्ये "देऊळबंद" नावाचा एक मराठी चित्रपट झळकला होता. मराठी चित्रपटसृष्टीच्या पठडीतील जाहीरात मोहीमांपेक्षा थोडीशी वेगळी वाट याच्या प्रसिद्धीसाठी वापरली गेली होती. फेसबूक आणि व्हॉटस्अप या सोशल नेटवर्कींग साईट्सचा प्रभावी वापर करण्यात आला होता. यामधे फेसबूकवर झकास रंगसंगती असलेले वॉलपेपर्स व काही मोजक्या शब्दांतील पोस्ट फिरवण्यात आल्या होत्या आणि व्हॉटस्अपवर बऱ्यापैकी विस्तारीत लघूलेखात स्वामी समर्थांच्या भक्तांना भावनिकदृष्ट्या चित्रपटगृहांमध्ये येण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. 
     स्वामी समर्थांचा भक्तसंप्रदाय महाराष्ट्रभर पसरला आहे. त्यांचे छोटे-मोठे मठ अनेक गावांत आढळून येतात. या मठांच्या स्वयंसेवकांना 'सेवेकरी' म्हटलं जातं. चित्रपटाच्या प्रसिद्धी मोहीमेत या सेवेकऱ्यांना दर्शकांना चित्रपटगृहांपर्यंत आणण्यासाठी खास आवाहन करण्यात आलं होतं. हा चित्रपट दहा कोटी रूपयांपर्यंत गल्ला जमवण्यात यशस्वी झाला, असं त्याच्या फेसबूक अकाउंटवर नमूद करण्यात आलं होतं. चित्रपट आर्थिकदृष्ट्या यशस्वी करण्यासाठी आधुनिकीकरण तंत्रज्ञान व तगड्या पटकथेपेक्षा देवाच्या भावनिक लेबलखाली सेवेकऱ्यांना कामाला लावण्यात आलं, असं म्हणता येईल.
      इतका हवा करण्यात आलेल्या या चित्रपटाविषयी खूप कुतूहल वाढलं होतं. पण, दोन-चार दिवसात हा एक तद्दन दुय्यम दर्जाचा चित्रपट असल्याची टिका समीक्षणांमधून होऊ लागली. चित्रपटात अतिशय बालीश असे युक्तीवाद पटकथालेखक आणि दिग्दर्शकांनी स्वामी समर्थ बनलेल्या मोहन गोखले यांच्या तोंडी कोंबून एक प्रकारे स्वामी समर्थ या विभूतीचा अपमानच केला आहे. यावर स्वामी समर्थ भक्तांनी पटकथाकार आणि दिग्दर्शकांना जाब विचारायचं सोडून चित्रपट डोक्यावर घेतला.
       स्वामींचे भक्त हे स्वामींना कोणी काही बोलले तर राडा घालणारे असतात, प्रसंगी त्यांना पोलीसांचा मार बसला तरीही स्वामी त्या भक्ताच्या मदतीला येत नाही, देव न मानणाऱ्यालाच देव भेटायला येतो, असे संदेश प्रसारीत करणाऱ्या या चित्रपटाने विज्ञानाला दुय्यम लेखण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. विज्ञानाने जे चित्रपट तंत्र विकसित केलं त्याचा वापर करून विज्ञानाशीच टक्कर घेण्याचा हा अट्टाहास हास्यास्पद वाटतो. बायनरी कोडींग, विमानं या बद्दलही आपलं तोकडं ज्ञान स्वामींच्या तोंडून पाजळून चित्रपट निर्मात्यांनी नक्की कोणाची उपेक्षा केली?
        हे फक्त एक प्रातिनिधीक उदाहरण झालं. व्हॉटस्अप, फेसबूकवरही तंत्रज्ञानाच्या मर्यादा सिद्ध करण्यासाठी रचलेल्या खोट्या नाट्या कथा फिरत असतात. त्या रचणाऱ्या मूर्खांनी कमीतकमी आपल्याला विज्ञानाने जे दिलं त्याबाबत तरी कृतज्ञ रहायला हवंय.
     विज्ञानाचा विकास हा एक प्रवास आहे आणि तो अखंड चालू रहाणार आहे. विज्ञानाशी बांधिलकी जपणाऱ्यांना त्या त्या काळातील विज्ञानाच्या मर्यादा पक्क्या माहीत असतात. विज्ञानाला अकारण नावं ठेवणाऱ्यांचं आयुष्य बारीकसारीक वैज्ञानिक उपकरणं आणि तंत्रज्ञानानेच व्यापलेलं असतं. फक्त त्यांना त्याची जाणिव नसते.
      तंत्रज्ञान नसतं तर सण सोहळे, भक्ती सत्संग वैगरेची दुकानं लावायला वीज, चमचमत्या वीजमाळा, सजावटीचं सामान इत्यादी गोष्टी कुठून आल्या असत्या? त्या-त्या काळातील भक्तीमार्गाचे चोचले तत्कालीन विज्ञान-तंत्रज्ञानानेच पुरवले आहेत. भक्तीमार्ग हा एक मोठा बाजार व अर्थव्यवस्था आहे. विज्ञान-तंत्रज्ञान त्याला पाठबळ पुरवत स्वतःही विकसित होत असतं.
     माणसाने प्रथम जेव्हा स्वतःहून अग्नी चेतवला असेल त्या काळापासून ते आताच्या रॉकेटच्या इंधनापर्यंत विज्ञानाने प्रगतीच केली आहे. धार्मिकता  आणि सत्तापिपासूपणाच्या अंधारात वैज्ञानिक विकास तसा आतापर्यंत दुर्लक्षितच राहीला. इतिहासाच्या पानांवर आणि सामाजिक जीवनात धार्मिक रूढी परंपरा आणि युद्धे लढाया यांचा जेवढा गवगवा आजही करण्यात येतो त्यानुसार भारतीय आणखी पाचशे वर्ष अज्ञान आणि कळपाच्या मानसिकतेत रूतलेले राहणार याबाबत कोणाला शंका नसावी.
        शिकारीसाठी पहिल्यांदा शस्त्र निर्माण करणारा, ओबडधोबड कसं का होईना घर बनवणारा मानव हा संशोधकच होता. ज्या व्यक्तीला विश्वाच्या कार्यपद्धतीविषयी कुतूहल वाटतं आणि जो आपल्या परीने त्याचं गूढ उकलण्याचा प्रयत्न करत असतो, असा प्रत्येकच जण विज्ञानाच्या प्रगतीत योगदान देत असतो. एक्स रे चा शोध लावणारा विल्यहेम रॉन्टजेन कोणत्याही प्रकारे ठरवून शोध लावत नव्हता. पण, त्याच्या शोधाचा आपण आज वैद्यकीय आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये फार वापर करतो. प्रत्येक गोष्टीत बाजारीकरण घुसलेल्या आजच्या जगात "ठरवून" केलेल्या संशोधनांचं प्रमाण वाढतं आहे. याचं कारण म्हणजे अमूक एक प्रकारची 'तत्वनिष्ठता' (जात, वंश, धर्म, राष्ट्रीयत्व, मार्क्सवाद , भांडवलशाही इ.) जोपासणाऱ्या सरकार आणि प्रशासनांनी अवलंबलेली धोरणं. त्यात समाजाची विज्ञानाप्रतिची उदासिनता या गंभीर परीस्थितीत भर घालते आहे. अमेरीकन लष्कराच्या एका महीन्याच्या खर्चाइतकाही वार्षिक अर्थसंकल्प नसणाऱ्या "नासा"या संशोधन केंद्राच्या आर्थिक तरतूदीत अमेरीकेने यावर्षी ३० कोटी डॉलर्स इतकी अतिरीक्त कपात केली आहे. कित्येक प्रगत व विकसनशील राष्ट्रांची मुलभूत संशोधनांतली गुंतवणूक सकल राष्ट्रीय उत्पन्नांच्या (GDP) ०.५% पेक्षाही खाली घसरली आहे. अशाच कारणांमुळे असेल कदाचित, आईनस्टाईनच्या सामान्य व विशेष सापेक्षता सिद्धांतासारखा एकही धमाकेदार शोध गेल्या शंभर वर्षांमधे लागू शकलेला नाही.
       वैज्ञानिकांना योद्धे, लढवय्ये, धर्मगुरू, कलाकार यांच्यापेक्षा दुय्यम मानण्याची मानसिकता प्राचीन आहे. सत्तासंघर्षात वैज्ञानिक, गणिती आणि वैद्यकीय क्षेत्रात जोरदार कामगिरी केलेली कित्येक ग्रीक, भारतीय, इजिप्शीयन विद्यापिठे इतिहासजमा झाली. पृथ्वी हा विश्वाचा केंद्रबिंदू नाही, असं प्रतिपादन केल्याबद्दल इटलीचा अवकाश संशोधक गॉर्डॕनो ब्रूनो याला सोळाव्या शतकात जीवंत जाळण्यात आलं होते. प्राचीन भारतात चार्वाकांच्या संस्कृतीचे अवशेषही मिळू नयेत, अशी खबरदारी घेण्यात आली.
       आपल्या सभोवताली प्रत्येक गोष्टीमागे विश्वाचा एक नियम, एक कोडं लपलेलं असतं. आपल्या हसण्यात, रडण्यात, वाढण्यात अमर्याद सूत्रं असतात. त्या कोड्यांची उकल करण्यात जी मजा असते तिची जाणिव कधीही बहूतांश लोकांना होत नाही. उलटपक्षी, हातात मोबाईल, घरात टि.व्ही, फिरायला कार, उडायला विमानं देणाऱ्या विज्ञान-तंत्रज्ञानाविषयी निराधार आक्षेप दाखवण्यात मात्र आपण कमी पडत नाही.
      तत्वाधारीत राजसत्ता आणि ऐतखाऊ धर्मसत्तांच्या नादाने आपण पुन्हा एकदा आपली वैज्ञानिक प्रगती अज्ञानाच्या मातीत गाडायच्या दिशेने प्रवास करतो आहोत.. आणि माझ्यासारखे काहीजण -  जिथे प्रत्येक नागरीक शास्त्रशुद्ध तर्क (Logical reasoning) करू शकत असेल, केलेल्या धार्मिक अथवा वैज्ञानिक दाव्यांचं स्पष्टीकरण देणं बंधनकारक असेल, सामाजिक-आर्थिक सुरक्षा या जाति-धर्म-पंथ-प्रदेश यांच्या आधारावर न तोलता सारासार विवेकाने वितरण केल्या जात असतील, अशा एका व्यवस्थेत जगण्याचं स्वप्न पाहतात. जय विज्ञान!