Search This Blog

Tuesday, December 27, 2016

बेरोजगार तरूण बनला 'शंकराचार्य'. राज्यातील सर्व स्टार्टअपस् ला मागे टाकून उत्पन्नाबाबतीत जोरदार घोडदौड.

सिंधुदुर्ग सावंतवाडी येथील एका युवकाने एका आर्थिक वर्षातील उत्पन्नाचे आजवरचे जिल्ह्यातील सर्व उच्चांक मोडीत काढले आहेत. सुरेंद्र माळकर या बेरोजगार युवकाच्या कामगिरीमुळे त्याचे सर्व भक्तगण अतिशय आनंदीत आहेत.
      सुरेंद्र हा एक अतिशय बोलघेवडा व साधारण बुद्धीचा तरुण सावंतवाडीतील एका खेड्यात वाढला. शासकीय नोकरीत शिपाई म्हणून चिकटण्यासाठी त्याने बरेच प्रयत्न केले परंतु त्यात त्याला यश आले नाही. "लेखी परीक्षेऐवजी बोलकी अंडी फेकायची असती तर मी नक्कीच यशस्वी ठरलो असतो", असं त्याचं म्हणणं आहे. त्याला कोकणात असलेल्या प्रथेप्रमाणे मुंबई-पुण्याकडे कामासाठी जाणे अनिवार्य होते. परंतु, ही गोष्ट मान्य नसल्याने गावालाच काहीतरी उद्योगधंदा चालू करावे असे त्याच्या मनात आले. नंतर सरकारची स्टार्टअप पॉलीसी तितकीशी दिलासादायक नसल्याचे त्याला त्याच्या मित्रांनी सांगितले. अशा अवघड परीस्थितीत एका जनमान्य स्थानिक सद्गुरुंनी त्याला शंकराचार्य पद विकत घेण्याचा सल्ला दिला. शिपाई बनण्यासाठी 'सेटींग' करता राखून ठेवलेले पैसे खर्च करून तो 'शंकराचार्य' बनला. "सरकारी नोकऱ्यांत हल्ली फार राम राहीला नाही. नेत्यांची संख्या भरमसाठ वाढल्याने वशीला चालत. शिवाय मरणाचं काम करावं लागतं. म्हणून शंकराचार्य बनण्याचा निर्णय घेतला.  सद्गुरु कृपेने यात कसलीही बाधा आली नाही," असं फार श्रद्धेने कान नाक घशाला विशिष्ट पद्धतीने स्पर्श करत त्याने सांगितले. (यात त्याने नाकातला मेकूडही साफ केला असं आमच्या प्रतिनीधीला वाटलं.)
     शंकराचार्य बनण्यासाठी झालेला खर्च सहा महीन्यांतच वसूल करून त्याने नफा कमावण्यास सुरूवात केली. एवढ्या कमी वेळात ब्रेक इव्हन पॉईंट असलेला अन्य उद्योग नसावा असं त्याचं ठाम मत आहे.
     " शंकराचार्य सुरेंद्रानंद सरस्वती" असे नामाभिधान धारण केलेल्या सुरेंद्र माळकरच्या यशाने त्यांच्या भक्तगणांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण आहे. सुरेंद्रच्या यशाचे गमक विचारले असता त्याने ते सांगण्यास नकार दिला.
      त्याच्या मठाचा अभ्यास करणाऱ्या एका प्राध्यापकाने दिलेल्या माहीतीनुसार 'फेसबुक' व 'व्हॉटसअप' यामुळे सुरेंद्र यशस्वी झाला आहे. त्या पंचक्रोशीत इंटरनेट नसताना सुरेंद्रने कुठूनसे सॕटेलाईट कनेक्शन मिळवले आहे. त्याद्वारे व्हॉटस्अपवर येणारे फुलाफुलांनी नटलेले शुभ सकाळ टाईपचे संदेश तो भक्तगणांना "गुरूबोध" या कार्यक्रमात मोबाईल लपवून वाचून दाखवतो. मुळच्या बोलक्या स्वभावामुळे या आयत्या अंड्यांना तो उत्कृष्ट फोडणी देऊन सादर करतो. यामुळे भक्त शंकराचार्य सुरेंद्रानंदावर फार भाळले असल्याचे समजते.

Friday, December 2, 2016

फेलोशीप

तुम्हला ग्राम विकास फेलों म्हणून का काम करायचे आहे?
मी मुंबई महापालीकेत सध्या कार्यरत आहे. परंतु, मी मूळ रत्नागिरी जिल्ह्याचा रहीवासी आहे. भारताच्या विकासाच्या वाटा गावांमधून जातात, असं माझं ठाम मत बनलं आहे. गावांचा विकास अस्ताव्यस्त होऊ नये, यासाठी विविध प्रकारच्या ज्ञानशाखांच्या उपयोजनाची गरज सध्या भासते. समाजात सकारात्मक बदल घडवू पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात अमूक एक गोष्ट केली तर विकास गतिमान व सुयोग्य पद्धतीने होईल अशी संकल्पना असते. माझ्या मनातील ग्रामविकासाच्या संकल्पना आजमावून पाहण्यासाठी ग्रामविकास फेलोशीप ही एक उत्तम संधी आहे याची मला खात्री वाटते.

स्थानिक लोकांसाठी काम करण्याच्या हेतूने फेलोजची नेमणूक महाराष्ट्रातील दुर्गम भागात करण्यात येणार आहे; त्या अनुषंगाने तुमच्याकडे असे कोणते अनुभव आहेत ज्यामुळे तुम्हाला वाटते कि तुम्ही अशा दुर्गम भागात काम करू शकाल?
माझं लहानपणाचा बराचसा काळ मी एका कोकणी खेड्यातील आजोळी व्यतीत केला आहे. तसंच इंजीनीअरींगच्या शैक्षणिक काळापासून बऱ्याचदा दुर्गम भागात निवासी ट्रेकींगसाठी जाण्याचेही योग आले. यावेळी पाहीलेल्या गावांच्या स्थितीत बदल घडावा असं मला नेहमी वाटत आलं. यासाठी मी माझी नोकरी सांभाळून संजय यादवराव यांच्या 'कोकणभूमी प्रतिष्ठान' ने आखलेल्या 'समृद्ध कोकण अभियान' मध्ये सहभाग घेतो. स्टॉकहोम वॉटर प्राईज विजेते डॉ. राजेंद्रसिंह आणि मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झालेल्या जलचेतना मोहीमेत मी स्थापत्य अभियांत्रिकीचे ज्ञान वापरून ग्रामविकासाचे प्राथमिक आराखडे बनविण्यात माझ्या सहकाऱ्यांना मदत करतो. यात प्रत्यक्ष क्षेत्रभेटी ते संगणकावरील सादरीकरण अशा सर्व बाबींचा समावेश होतो. शासकीय यंत्रणेचा अंतर्गत अनुभव ही माझी जमेची बाब आहे.

फेलोशिप कार्यक्रमामध्ये मिळणाऱ्या अनुभवाचा वापर तुम्ही तुमच्या भावी आयुष्यात कशा पद्धतीने करू इच्छिता?
गावांचे येत्या काळात शहरीकरण अटळ आहे. परंतु, त्यात गावांचे बकालीकरण होऊ नये. ग्रामीण भागात जपल्या गेलेल्या काही शाश्वत मूल्यांचे, संस्कृतीचे व सर्वांत महत्वाचं म्हणजे निसर्गाचे संवर्धन व्हावे , ग्रामविकासाची प्रक्रीया संतुलित राहावी यासाठी एक लवचिक चौकट बनवता येईल का प्रश्नावर माझा भर आहे. एक वर्षाच्या फेलोशीपच्या काळात याबाबतचे बरेचसे ज्ञान माझ्याकडे संकलीत होईल ज्याचा लाभ शासन, ग्रामविकासासाठी कार्यरत असलेल्या असलेल्या व्यक्ती व संस्थांना देणे शक्य होईल.