एका महान राष्ट्रात एक अतिशय निसर्गसुंदर प्रदेश होता. दुर्गम, रमणीय डोंगर ते लखलखत्या रूपेरी वाळूचे किनारे असं सर्व काही त्या चिंचोळ्या जमिनीच्या पट्ट्याला निसर्गानं बहाल केलेलं होतं. पण, या देखण्या भूभागाला एक शाप होता. हा भाग गरीब होता. या भागातली हुशार आणि कष्टाळू तरूणाई देशाच्या इतर मायानगरीत वाहून जात असे. पावसाचं धो-धो पाणी त्या जमिनीवर फार काळ टिकत नसे. या प्रदेशाने पूर्वी फार तल्लख व चिवट सुभेदार देशाला दिले होते. पण, आता तशी परीस्थिती नव्हती.
या शापीत निसर्गरम्य भागात एक संन्यासी राहात होता. पंचावन्न वर्षांच्या या संन्याश्याने असंख्य गरीब , गरजू शिष्यांना जीवनाचा राजमार्ग दाखवला होता. त्याचे शिष्यही गुरुविषयी फार कृतज्ञता बाळगून होते.
या संन्याश्याकडे एकच जूनी कफनी होती. पण, ती कफनीही त्याला अतिशय शोभून दिसत असे. त्यातून त्याचे ७०% अंग झाकले जात असे. बाकी ३०% ची त्याला चिंता नव्हती.
त्याची किर्ती राजाने फार ऐकली होती. अचानक एके दिवशी त्याला राजाचा निरोप आला. निरोप कसला, राजाचा आदेशच जणू. "महंत, आम्ही आपली किर्ती फार ऐकून आहोत. पण, आपण तीच ती जूनी कफनी परीधान करता हे आम्हास काही पटत नाही. आपण ती जूनी कफनी ताबडतोब फेकून द्यावी. आम्ही लागलीच तुमच्यासाठी तलम रेशमी कफनी पाठवतो आहोत."
संन्यासी विचारात पडला." अरेच्च्या, ही कफनी माझ्यासाठी शुभलक्षणी आहे. जून्या राजाने मला ती दिली आहे. या कफनीच्या सोबतीने मी चार पिढ्या घडवल्या. आता ही तलम रेशमी कफनी मला हवीच आहे. पण, ही जूनी कफनी मी काही फेकायचा नाही."
त्याने ही गोष्ट त्याच्या लाडक्या शिष्यांना कळवली. राजाचा असा विचित्र आदेश ऐकून ते ही अवाक झाले. त्यांनी लगेचच चर्चेतून राजाचा आदेश कसा अयोग्य आहे, याबाबत मुद्देसूद खलीता तयार करून राजाला पाठवला. पण, राजा फारच हट्टी होता. त्याने उलट निरोप धाडला."महंत, तुम्हाला तलम रेशमी कफनीच वापरावी लागेल. जूनी वापरता येणार नाही."
संन्यासी आणि शिष्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. तरीही, राजाने तलम रेशमी कफनी स्थानिक सुभेदारांकरवी पाठवली आणि जूनी हिसकावून जाळून टाकली. संन्याशाने पाहीलं, ती मलमली कफनी फारच पारदर्शक होती. ती घातल्यावरही माणूस उघडा नागडाच वाटेल. संन्याशाने याबाबत त्याने सुभेदारांकडे विचारणा केली तर ते दरडावणीच्या स्वरात उत्तरले," हे बघ गोसावड्या, असले फालतु प्रश्न करू नको. राजाचा राजशिंपी फार कामात असतो. त्याला जेवढा वेळ मिळाला त्यात त्याने हे एवढं करून दिलं याची जाण ठेव. नाहीतर घालायला कपडाही मिळाला नसता. सगळे जूनाट कफनी, अंगरखे जाळायचे राजाचे आदेश आहेत"
त्या तलम रेशमी कफनीसोबतच राजाने देशावरचे नविन शिष्यही पाठवून दिले. संन्याश्याचा आश्रम त्या नवीन शिष्यगणांनी भरून गेला. ते विद्यार्थी अंगापिंडाने मजबूत आणि दांडगट होते. त्यांनी संन्याश्याकडील स्थानिक शिष्यांना हूसकावून लावले.
संन्यासी या धक्क्यातून आजही सावरला नाही. त्याचा जीव दांडगट विद्यार्थ्यांनी हूसकावून लावलेल्या त्या कोवळ्या विद्यार्थ्यांमधे अडकला होता.
This blog is not dedicated to a specific purpose. The blogger wanders through many fields and expresses his experiences in his style.
Search This Blog
Wednesday, November 23, 2016
संन्याश्याची कफनी आणि विनोदी राजा.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment