गदी दोन वर्ष आधीपण बरं होतं..
मी बिनधास्तपणे तुझा गजर करत होतो..
आता दुनियादारी बघितली, निरीश्वरवादीं लिखाण वाचलं, धर्मांची आणि तुझीही उत्पत्ती वाचली..
बुद्धी सारासार विचार करू लागली..
इथे ध्यान- चिंतन करण्याला अध्यात्माशी जोडलं गेलंय,
आणि अध्यात्माचं तंगडं धर्माच्या तंगड्यात अडकवलं गेलंय..
विरोध कशाला, कुठे आणि किती करायचा..
काय आणि किती स्विकारायचं याचा गुंता संपत नाही.
व्यवहारात निरूपयोगी असलेल्या बालपणीच्या खेळण्याशी आनंद आठवणी जोडलेल्या असाव्या..
ते खेळणं टाकून देता येत नाही म्हणून जपून ठेवावं, तसं आता तुझं माझं झालंय..
तुझा हात अचानक सोडायचा तर जी पोकळी तयार होईल ती कशाने भरायची?
विज्ञान आणि तर्काने जगाची खरी ओळख पटतेय..
पण अज्ञानातलं भावनिक सुख त्यात नाही.
श्रद्धा ठेवली तर प्रचिती येते म्हणतात..
पण, मी स्वतःशीही भांडणारा माणूस, कसलंच प्रमाण न मानणारा..
जगात इतका गदारोळ, विरोधाभास आणि विषमता असताना कोणावर श्रद्धा तरी कशी ठेवावी?
तू खरंच असशील तर ..
एवढा गोंधळ समजून घे..
©ओमकार गिरकर
No comments:
Post a Comment