Search This Blog

Monday, May 2, 2016

नवीन चित्रपट संस्कृतीची चाहूल.

आगामी काळात मराठी वर्तुळात एक ओळखा पाहू पद्धतीचं कोडं विचारलं जाईल. "एक चित्रपट, भाराभर परीक्षणं, ओळखा पाहू".. उत्तर निर्विवाद असेल "सैराट"
       पूर्वी एखादं परीक्षण लिहीणे म्हणजे एक विशेष काम असायचं. ठराविक शिक्षण घेतलेले ठराविक लोक टिका टिप्पणी, परीक्षण, समीक्षा वैगरे लिहायचे. जसा चित्रपटसृष्टीतून विनोदी पात्रांचा जमाना गेला आणि मुख्य पात्रच विनोद, खलभूमिका असं सर्व काही साकारु लागले, तसंच लेखन क्षेत्राचंही. फेसबूक, ब्लॉग अशा तंत्रज्ञानामुळे एरवी वाचकाच्या भूमिकेत असणारेही लिहीते झाले. वर्तमानपत्र, मासिकं किंवा इतर कुठल्याही अभिव्यक्तीच्या माध्यमातली कटकट किंवा मक्तेदारी इथं लागू होत नाही. सारं काही मुक्त! ते ही अत्यल्प खर्चात. अनेक क्षेत्रांचं स्थैर्य आंतरजालावरील सुविधांनी हादरवून टाकलं आहे.
        तीच परीस्थिती नागराज मंजूळेच्या तीन कलाकृतींनी विशेषतः आताच्या "सैराट" मुळे निर्माण झाली आहे. हा चित्रपट सामाजिक वास्तवावर काय भाष्य करतो यावर खूप जण बोलत आहेत. आपण दोन वेगळे मुद्दे लक्षात घेऊ सध्या. पहीला त्याचं चित्रीकरण आणि दुसरा नवीन व्यवसाय प्रारूप (Business Model)
         मी अद्यापही हा चित्रपट पाहीलेला नाही. पण त्याच्या झलक फिती (trailer) वारंवार पाहील्या आहेत. अत्यंत व्यावसायिक पद्धतीने बनलेल्या एका लघूपटाचा माझ्याकडे अनुभव आहे. वेगवान विहंगम दृष्य (उंचावरून वेगाने जाणारा कॕमेरा) टिपण्यात किती तांत्रिक ताकद वापरली जाते याचा अंदाज आहे. नागराजने याचा भरपुर वापर केला आहे. चित्रपटातील युगूलाच्या डोक्यावरून सरसरत नदीपलीकडे जात मावळत्या सूर्यावर जाणारा कॕमेरा, प्रचंड मोठ्या मैदानातील घोडेस्वारी टिपणारा कोन, दोन भल्यामोठ्या भिंतींच्या मधोमध पायऱ्यांचा समतोल साधणारा कोन निव्वळ अफलातून आहेत. भारतातील बऱ्याचशा पर्यटनासाठी प्रसिद्ध वेबसाईटवर "महाराष्ट्र एखाद्या चित्रपटात इतका सुंदर कधीही दिसला नव्हता" अशा आशयाच्या टिपण्या वाचायला मिळत आहेत. करमाळा भागात यावर्षी भरपूर पाऊस झाला तर निश्चितच पुढच्यावर्षी मोठ्या प्रमाणावर पर्यटन तिकडे वळेल.
           दुसरा मुद्दा बीझनेस मॉडलचा. मोठ्या चित्रपट निर्माण संस्था सामान्यतः प्रथितयश कलाकारांना प्राधान्य देतात. चित्रपटाच्या कथानक आणि तांत्रिक बाजूंना दुय्यम माप दिलं जातं. लोकप्रिय अभिनेता अभिनेत्रींच्या नावावर भंगार सिनेमे विकले जातात. चित्रपट किंवा कोणताही मनोरंजन व्यवसाय हा किमान माझ्यामते एक सर्वसामान्य व्यवसाय आहे. पण, कलाकारांना उगाचच समाजात मोठेपण दिलं जातं. त्यांच्याबाबत बरंच काही बोललं, लिहीलं, चर्चिलं जातं. ज्यातून समाजाचा कोणताही फायदा होत नाही. कित्येक उपयोगी मानवी तास, स्रोत वाया जातात. नागराजने ही प्रथा सलगपणे मोडायची ठरवली असावी. भूमिकेला साजेसे अगदी नवखे चेहरे घेऊन तो त्याला हवं तसं काम काढून घेतो आहे. स्थिरावलेल्या कलाकारांच्या तारखांची सांगड घालणं, त्यांचे नखरे सहन करणं, वर चित्रपट निर्मितीच्या एकूण तरतूदींपैकी निम्म्याहून जास्त रक्कम त्यांना देणं, अशा कटकटींपासून त्याने सहज वेगळी वाट काढली आहे. हा वेळ आणि पैसा तो कथानक आणि तांत्रिक बाजूंवर खर्च करू शकतो. तेच यशाचं समीकरण असावं.
      मराठी अस्मिता, निखळ मनोरंजनाच्या नावाखाली तेच ते बोजड चेहरे, बोगस अभिनय आणि कथानक, गचाळ तंत्रकौशल्य प्रेक्षकांच्या टाळक्यावर हाणणाऱ्या प्रस्थापितांना हा खणखणीत इशारा आहे. प्रेक्षकांना आवडतं म्हणून आम्ही तसं बनवतो, या पालूपदाखाली लपणाऱ्यां आणि दुसरीकडे कलात्मकता किंवा अभिजाततेच्या नावाखाली रटाळ समांतर चित्रपट बनवणाऱ्यांच्या मधे असलेल्या दरीमधून नागराज यावेळेला अलगद निसटला. 'कोर्ट'च्या चैतन्य ताम्हाणेनेही एक वेगळंच बीझनेस मॉडल सादर केलं होतं. प्रस्थापितांना धोक्याची घंटा अशी, की तो अजुनही वयाची तिशी पार करायचा आहे.
        तेच तेच गुळपीठ किंवा कोल्हापूरी हेलातले संवाद , तीच ती कथानकं दाखवायचे दिवस संपले आहेत. मराठी चित्रपट चालत नाहीत, ही सबब सांगण्याआधी आपण प्रेक्षकांना थूकपट्टी करतोय का, यावर चिंतन होणं गरजेचं आहे. हिंदी आणि संलग्न (भोजपूरी इ. ) चित्रपट निर्मिती ही सर्रास सुमार दर्जाची असते. लोक कंटाळले आहेत. दर्जेदार इंग्रजी चित्रपटांचे अलीकडचे भारतातील कमाईचे आकडे पाहीले तर हिंदीवाल्यांना आकडी येईल. अशा या कोलमडणाऱ्या हिंदी उद्योगाची नक्कल करायचा प्रयत्न केला तर मराठीचाही कपाळमोक्ष व्हायचा.
       मराठी अभिनेत्यांनी गरीब रहावे, असं यात मला म्हणायचं नाहीय. पण, कथानक, संगीत- पार्श्वध्वनी, चित्रतंत्र या बाबी गुंडाळून निव्वळ हिरोगिरीचा मार्ग पत्करण्याचा कर्मदरीद्रीपणा घडू नये. बरेचदा चित्रपट हा दिग्दर्शक आणि निर्मात्यांचा विषय असतो, आपण फक्त 'स्टारडम' मिरवायला आहोत अशा अविर्भावात कलाकार असतात. त्याऐवजी उत्कृष्ट सांघिक कामगिरीसाठी कलाकार व इतरांनी एकत्र यावे. हिंदी चित्रपटसृष्टी निर्मितीमूल्यांच्या कोनातून कोणत्याही प्रकारे नक्कल करण्याजोगी नाही. भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ एका मराठी माणसाने रोवली आहे. मराठीच याचं नेतृत्व करणार.
      अनेक उत्तम परदेशी दिग्दर्शक व निर्माते हे उच्च दर्जाचे तंत्रज्ञ आहेत. जेम्स कॕमेरॉन हा टायटॕनीक, अवतार अशा विश्वविक्रमी चित्रपटांचा दिग्दर्शक 3D तंत्रज्ञान, पाण्याखालील चित्रीकरण अशा संशोधनांचा सह-जनक आहे. नेहमी हॉलीवूडकडून उचलेगिरी करून भारतीय चित्रपट बनवावे असा नियम नाही. नागराज अस्सल मातीचा गंध तंत्रकौशल्यात बंद करतो आहे. हे ही सैराटचं यश आहे. मराठीच्या बोलीभाषा ही मराठीची ताकद आहे. मराठी समजून घेण्यासाठी व ती आपलीशी करण्यासाठी परभाषिकांना प्रोत्साहन द्यायचं असेल तर चित्रपट हे एक प्रभावी माध्यम ठरेल.
         आर्थिक व सामाजिक स्तरावरचा कथित उच्चभ्रूपणा (VIP संस्कृती) मोडून काढण्यासाठी प्रयत्न होत आहेत. तेच नागराज सिनेक्षेत्रात साधू पहातोय. त्याच्या चित्रपटातील तारे सिनेमाचा प्रभाव संपण्याच्या आधीच मूळ आयुष्यात परततात. ते "ग्लॕमर" च्या कचाट्यात सापडले नाहीत तर उत्तम. आकाश ठोसर म्हणजे सैराटच्या नायकाने 'चला हवा येवू द्या' कार्यक्रमात निलेश साबळेला छान उत्तर दिलं. "मला या क्षेत्रात करीयर करायचं नाहीय, पण अँक्टींग निश्चित करायची आहे". या क्षेत्रात पूर्णवेळ राहून करीयर करायचं म्हणजे काय-काय करावं लागतं याची त्याला जाणीव असावी.
        चित्रपटांतून आपल्याला आशय, मनोरंजन, संगीत, एक दर्जेदार नवनिर्मितीचा अनुभव मिळाले पाहीजेत. स्टार्स आधीच फार झालेत. काही फार माजलेत. आता आणखी नकोत. नागराज, वाट भटकू नको, भावा.

No comments:

Post a Comment