मला उपमांचे खेळ करायला आवडत नाहीत. पण, खूप जणांना थोड्याश्या अवघड गोष्टी अलंकारीक पद्धतीने मांडलेल्या आवडतात, पटकन समजतात. म्हणून हा एक अवघडलेला प्रयत्न.
*****-----*****------*****
पृथ्वीचं पोट (भूगर्भ) हे एक बँकेचं खातं आहे. ज्यात वर्षानूवर्षांची पाण्याची झालेली बचत साठवलेली होती. अगदी पिढ्यान पिढ्या साठत आलेली बचत. जमीनीवर असलेलं पाणी जसं की नदी, सरोवरं ही तुमची कमाई आहे. त्यातला ३५% वाटा सूर्य नावाचं आयकर खातं कापून घेतं. तेच पुढे पावसाच्या रूपाने तुमच्या पगारासारखं परत येतं. त्यातला काही भाग तुमच्या भूगर्भातील बचत खात्यात जमा होतो. तर बराचसा भाग तुम्ही खर्च करता. आता खाणारी तोंडं वाढली (लोकसंख्या). उधळपट्टी वाढली. तसं तुम्ही बचत खातं पण बुडीत काढायला निघालात. त्या खात्यामुळे इतर जे व्याज म्हणून मिळणारे फायदे होते. (वन संपदा, तापमान नियंत्रण) ते ही कमी होऊ लागले.
पाऊस दरवर्षी पडतो. पण आपल्याला सवय काय? तर पगार झाला की पंधरा वीस दिवस मजा मारायची. शेवटचे आठ - दहा दिवस भणंगासारखं उधार उसनवारी करत फिरायचं. तीच परीस्थिती आताही आहे. जागतिक हवामान बदलामुळे पगार (पाऊस) वेळेवर व पुरेसा होईनासा झालाय. आपल्या उधळपट्टीला आवर नाही. त्यात शुद्ध पाण्याच्या जलचक्रात (पाऊस - बाष्पीभवन -पाऊस) आपण गटारं व सांडपाणी नावाचं एक वाईट कर्ज वाढवत नेतोय.
थोडक्यात, पाण्याच्या बाबतीत आपण लवकरच 'विजय माल्ल्या' होणार आहोत. तो देश सोडून पळाला. तुम्ही पृथ्वी सोडून कुठं पळणार आहात?