दुष्काळ पडलाय. भयंकर परीस्थिती आहे. सृष्टी निर्विकार आहे. पण, तुम्हाला जगायचं आहे की नाही?
"होय. आम्हाला जगायचंय."
मग पाणी मिळण्यासाठी काय कराल?
"आंदोलनं करू, मोर्चे काढू, सरकारला हैराण करू, प्रशासनाला भंडावून सोडू, मतदानावर बहीष्कार घालू, जाळपोळ करू, तोडफोड करू. "
अरे वा.. याने पाऊस पडेल? नद्या भरभरून वाहतील?
"काय माहीत.. आम्हाला तर एवढंच जमतं"
मग मरा सगळे.
"असं का बोलतो, दादा.. सांग की काय करायचं ते."
कुदळ फावडं हातात घ्या. आपल्याला जलमंदीरं बांधायची आहेत.
"जलमंदीरं म्हणजे?"
बांध, बंधारे, समतल चर..
"ते कशाला? आम्हाला तर पाणी नळातून येतं."
नळात पाणी कुठून येतं?
"कुठल्यातरी नदीतून येत असेल."
नदीत पाणी कुठून येतं?
"पावसामुळे."
बरोबर. पावसाचे महीने किती?
"चार."
मग इतर आठ महीने नदीत पाणी कुठून येणार?
"समजलं.. समजलं.. चला रे पटापट. जलमंदीरं बांधू."
हे असं महाराष्ट्रातील प्रत्येक गावात जर पंधरा वीस वर्षांपूर्वी घडलं असतं तर आज दुष्काळ नसता. हरकत नाही. बिघडलेल्या गोष्टी कधीतरी दुरूस्त कराव्या लागतातच. चूकी कोणाची ते शोधण्यापेक्षा वैयक्तिक पातळीवर आपण काय-काय करू शकतो ते पाहू.
२००८ पासून मी सामाजिक-राजकीय क्षेत्रांमध्ये विशेष रस घेऊन वावरतो आहे. देश बऱ्यापैकी फिरून झाला आहे. जिथे फार चांगलं काही घडत नाही तिथे नक्की काय बिघाड आहे ते शोधण्याच्या प्रयत्नात मला जाणवलेल्या गोष्टी :
१. अगदी पुरातन काळापासून आपण फक्त मानवी जीवन आणि त्याचा आवाका यातच गुरफटलो आहोत. यात आपल्याला भांडणं, वाद ते युद्ध यात जबरदस्त रस आहे. मारामाऱ्या करणारा गल्लीतला भाई ते सीमेवर युद्ध करणारा सैनिक या सगळ्यांविषयी आपल्याला सुप्त / प्रकट कौतूक असतं. त्यामागच्या हेतूची फार क्वचितच पर्वा केली जाते. कमी अधिक प्रमाणात सत्ता आणि दरारा (वट) याची इच्छा आपणा सर्वांनाच असते. पण, ते मिळवण्याच्या नादात आपण व्यापक चित्र नजरेआड करतो. पाण्याचं आणि दुष्काळाचं राजकारण याच प्रेरणेमुळं केलं जातं.
२. प्रत्येक प्रश्नावर उपाय (दवा) शोधण्याआधी आपण प्रार्थनेचा (दुवा) मार्ग अनुसरतो. मग पाऊस पडावा म्हणून यज्ञ, सामूहीक नमाज , प्रार्थना सभा यांची आयोजनं केली जातात. हल्ली फेसबूक व्हॉटस्अप ट्वीटरवर डीजीटल प्रार्थना केल्या जातात. आपल्याला आपली जबाबदारी पार पाडल्याचं सुख मिळतं. पण, त्यातून प्रत्यक्ष परीस्थितीत काडीमात्र फरक पडत नाही. कारण, वास्तवात काही घडवायचं तर आधी विचारपूर्वक सुनियोजित कृती करावी लागते. तरच प्रार्थना फळाला येतात. ही कृती कोण करणार, याबाबत इतरत्र बोटं दाखवली जातात.
३. आपल्याला वैयक्तिक ध्येय फार असतात. सामुहीक ध्येय जातीसाठी आरक्षण, सण उत्सव साजरे करणं या पलिकडे फार जात नाहीत. एक देश, एक राज्य, एक जिल्हा, एक तालूका किंवा गाव यांचं उद्दीष्ट काय असावं याचा विचार व त्यानुसार कृती घडल्याची उदाहरणं दुर्मिळच. एकटे दुकटे हिवरेबाजार किंवा राळेगणसिद्धी किंवा आसाम एक भौगोलिक सहवास म्हणून एकजूटीने आपापल्या प्रदेशाच्या विकासासाठी सरसावतात.
धर्म, पंथ, जाती, भाषा, राज्य, देश, आर्थिक स्तर या मानवनिर्मित गोष्टी आहेत. त्यामुळे या गोष्टींच्या आधाराने विकास साधायचा म्हटला तर अनेक वादांना तोंड फुटतं. विशिष्ट भौगोलिक रचना व वातावरण असलेल्या भागांनी एक प्रदेश म्हणून स्वतःचा सामुदायिक विकास नियोजन करणं हे नैसर्गिकरीत्या सयुक्तिक आहे, ही गोष्ट आता आपल्या लक्षात येते आहे. या नियोजनात इतर सर्व बाबींचा सुयोग्य आदर राखून वाटचाल करण्याने बरंच काही साध्य होईल.
सध्याच्या केंद्र व राज्य शासनाने या विकेंद्रीत विकासाला लोकसहभागातून चालना देण्यासाठी उपयुक्त पावलं उचलली आहेत. ग्रामपंचायतींना थेट निधी देणं असो वा विकेंद्रीत जलसाठे निर्माण करण्यासाठी जलयुक्त शिवार योजना असो, लोकांनी सहभागाशिवाय काहीही घडणार नाही. या कामांची परीणामकारकता वाढवणं व त्यातील श्रम, वेळ व पैसा वाचवण्यासाठी इस्रो या अवकाश संशोधन संस्थेनं "भूवन पंचायत" हे पोर्टल विकसित केलं आहे.
'मी एकटा काय करणार' अशा विवंचनेत असाल तर डॉ. राजेंद्रसिंह, बाबा आमटे, पोपटराव पवार, अण्णा हजारे या माणसांनी त्यांच्या त्यांच्या भागात घडवलेले बदल पहा. डॉ. राजेंद्रसिंह यांनी पहील्यांदा दोन माणसांना सोबत घेऊन सुरू केलेल्या कामाला नंतर अनेक माणसं जोडली गेली व त्यांनी कोणत्याही सरकारी मदतीविना ११००० बंधाऱ्यांची बांधकामं बिनाकंत्राटी पद्धतीनं करून राजस्थानसारख्या वाळवंटात ७ नद्यांना जीवदान दिलं.
मित्रहो, जमीन/भूमी हिला आपण आई मानतो. पण आपली आई गेली कित्येक वर्ष तहानलेली आहे. तिच्या पोटातल्या पाण्याचा आपण भरमसाठ उपसा केला. पण, पावसाचं पाणी पुन्हा तिच्या पोटात भरणं विसरलो. त्यामुळे, आता तिला ताप आला आहे. तापमानवाढीचा वेग दर वर्षाला वाढतो आहे. परीणामी, आपली भावंडं असणारी कित्येक झाडं आणि सजीव प्रजाती मरण पावल्या. पावसात वाहून गेलेल्या मातीने झाडांचा आधार नष्ट झाला आणि नदी तसंच समुद्रात घुसलेल्या मातीने जलचरांचं जीवन धोक्यात आणलंय. जमिनीवर झाडं आणि छोट्याछोट्या पाणीसाठ्यांच्या अभावामुळे स्थानिक वातावरणात निर्माण होणारे ढग तयार होत नाहीत. म्हणून पावसाचं प्रमाण घटलं आहे. या कारणांनी घाटमाथ्यावर शेती आणि किनारपट्टीला मासेमारी अडचणीत आल्याने आर्थिक मंदी आणि महागाईचं सावट गडद होत आहे.
या दुष्टचक्रातून सुटका हवी तर प्रत्येकाने कामाला लागणं अत्यावश्यक आहे.
याची पूर्वतयारी:
१. आपले आदर्श व हिरो यात बदल करणं.
२. आपल्या मौजमजेच्या व प्रतिष्ठेच्या व्याख्या बदलणं.
३. वाचन व माहीती मिळवण्याच्या वृत्तीला प्रयत्नपूर्वक जोपासणं व त्यात सुधारणा करणं.
नाविन्यपूर्ण उपक्रम राबवताना ते यशस्वी होतील की नाही, याची शाश्वती देणं अवघड असतं. अशा उपक्रमांचं यश हे कित्येक गुंतागुंतीच्या विषयांशी जोडलेलं असतं. अशा वेळेला प्रचंड अभ्यास, उपयोगी पडणाऱ्या ओळखी पाळखी आणि संयम यांची जोपासना करावी लागते. "नेटवर्कींग" अर्थात आपल्या कार्याशी संबंधीत लोकांना आपल्याशी औपचारिक /अनौपचारिक पद्धतीने जोडून घेणं हा सामाजिक क्षेत्रात तसा दुर्लक्षित राहीलेला पैलू आहे. बहुतांश सामाजिक कार्यकर्ते एखाद्या विषयात एकेकटे झगडत असतात. यात स्वाभिमान ते स्वार्थ असं काहीही असू शकतं. यामुळे कामाच्या विस्ताराला मर्यादा येतात. काही वेळेला एका ठिकाणी यशस्वी ठरलेलं प्रारूप (Model) जसंच्या तसं अन्य ठिकाणी उतरवण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे त्या कामाची पुनरावृत्ती केली तरी यशाची खात्री दिली जाऊ शकत नाही. इतरत्र यशस्वी झालेली सुयोग्य कार्यपद्धती उचलताना त्या-त्या ठिकाणच्या परीस्थितीला अनुकूल असणाऱ्या पावलांसाठीही जागा ठेवावी.
सामाजिक क्षेत्रात कार्य करताना संयम प्रचंड महत्वाचा असतो. एखाद्या पडीक जमिनीत जंगल उगवायचं तर कमीतकमी १५ वर्षे लागतील याची खूणगाठ मनाशी पक्की करावी. जलतज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांच्या शब्दांत सांगायचं झालं तर इतिहास घडायला काही क्षण पुरतात, भूगोल बदलायला एक तप (१२ वर्षे) खर्च करावं लागतं. शासकीय यंत्रणांशी समन्वय साधताना, निरूत्साही किंवा नकारात्मक लोकसमूहांसोबत काम करताना हा संयमच आपल्याला सकारात्मक परीणामांकडे घेऊन जाणारा मित्र ठरतो.
बऱ्याचदा आपली अशी धारणा असते की सामाजिक कार्य हे आपला कामधंदा सोडून करायचे उद्योग आहेत. परंतु, त्यात काहीच अंशी तथ्य आहे. आपल्या पोटापाण्याचा विषय वगळता इतर वेळ जो आपण मित्र किंवा नातेवाईक यांच्या सोबत अथवा असाच काही न करता दवडत असतो तो सामाजिक कामात गुंतवायचा. आपल्या आवडी-निवडी व प्राथमिकता थोड्याश्या बदलल्या ही गोष्ट सहजसाध्य होते. यात तुमचे मित्र व नातेवाईक सहभागी झाले तर कौटूंबिक व सामाजिक या दोन्हींचा झकास मेळ घातला जातो. उदाहरणार्थ, आमटे कुटूंबिय.
जर सामाजिक-आर्थिक क्षेत्रात काम करू इच्छित असाल तर त्याचा एका विशिष्ट क्षेत्रापुरता विचार न करता सृष्टीरचने (Eco system) सारखा अभ्यास करावा व त्याप्रमाणे व्यवस्थापन करावं. जसं की एखाद्या शेतकरी समूहाने आधुनिक शेतीकडे वळण्याचं ठरवलं तर त्याला जोडधंदे व पूरक व्यवसायांची प्राथमिक मांडणी गरजेची आहे. आधुनिक शेतीसाठी लागणारी हत्यारे पुरवणे, त्यांचा मेंटेनन्स , इतर तंत्रकौशल्य पुरवणे, वाहतूक व्यवस्था उभी करणे या सर्वांचा विचार प्रकल्पामध्ये व्हायला पाहीजे.
प्रत्येकाचं एखादं वैशिष्ट्यपूर्ण शिक्षण व कौशल्य असतं. ते वापरून आपण बरंच योगदान देऊ शकतो.
१. एखादा स्थापत्य अभियंता गावाचं सर्वेक्षण करून जल आराखडा व ग्रामविकास आराखडा बनवून देऊ शकेल.
२. एखादा माहीती तंत्रज्ञान अभियंता/ बी.एससी - एम एस्सी कंम्प्यूटर सायन्स पदवीधर गावाला वेबसाईट वा इ-कॉमर्स व्यासपीठ उपलब्ध करून देऊ शकेल.
३. एखादा यांत्रीकी अभियंता शेतकऱ्याचे श्रम कमी करू शकणारं सुटसुटीत यंत्र बनवू शकेल.
४. चार-पाच डॉक्टर एकत्र येऊन सहकारी तत्वावर ग्रामीण दवाखाना चालवू शकतील.
५. एखादा वाणिज्य शाखेचा पदवीधर अकाउंट सांभाळणे, पतपुरवठा काटेकोरपणे हाताळणे व आयकर भरणे इत्यादी सुविधा पुरवू शकेल.
६. एखादी कला किंवा वकीली क्षेत्रातील व्यक्ती सरकारी योजनांचा अभ्यास, प्रकल्प अहवाल तयार करणे इत्यादी सेवा पुरवू शकेल.
अशा पद्धतीने आपल्या अंगभूत कौशल्याचा अथवा शिक्षणाचा वापर करून सामाजिक-आर्थिक क्षेत्रात मोठे यश मिळवणारी कित्येक उदाहरणे आहेत. आदरणीय डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या "Target 3 billion-Innovative solutions towards sustainable development " या पुस्तकात याबद्दल तपशीलवार वाचायला मिळेल.
अशा नाविन्यपूर्ण उपक्रमातून सामाजिक काम करतानाच सर्वांचा आर्थिक व वैयक्तिक उत्कर्ष साधणे शक्य आहे. गरज आहे अढळ इच्छाशक्तीची आणि अथक परीश्रमांची !