Search This Blog

Thursday, November 26, 2015

लेटर्स टू अ यंग सायंटिस्ट : अनुवादीत पुस्तकावर टिपणी.

        रिनर मारीया रिल्के या सुप्रसिद्ध जर्मन कवीने त्याचा शिष्य फ्रँझ कापुस्स याला काव्यनिर्मिती, सर्जनशिलता याबाबत दहा पत्रांद्वारे जे अनमोल मार्गदर्शन केलं ते "लेटर्स टू अ यंग पोएट" या नावाने जागतिक साहीत्यात दर्जेदार कलाकृतीत (world classics) समाविष्ट झालं. अशाच शिर्षाखाली अनेक प्रकारची पुस्तकं नंतरच्या काळात निघाली. त्यापैकीच एक डॉ. एडवर्ड ओ. विल्सन यांचं "लेटर्स टू अ यंग सायंटिस्ट".
         डॉ. विल्सन यांनी एक कुणी विशिष्ट व्यक्तीला संबोधून ही मार्गदर्शनपर पत्रं लिहीण्याऐवजी जगात प्रत्येकात लपलेल्या एका संशोधकाला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुठल्याही क्षेत्रात आपला आयुष्याचा मार्ग शोधणाऱ्या व्यक्तीला जशा अडचणीं असतात तशाच त्या एका संशोधकाला/ शास्त्रज्ञालाही असतात. वाढत्या वयात घरातून, आजूबाजूच्या सामाजिक-आर्थिक-राजकीय परीस्थितीतून आपल्यावर संस्कार होत असतात. काही गोष्टी आपण स्वतःहून शिकत असतो. तसाच लहानगा एडवर्ड घराच्या आजूबाजूच्या परीसरात हिंडताना किटक, फूलपाखरं यांच्या प्रेमात पडला. कधी कुठले समूह जंगलात फिरायला नेणारा वाटाड्या , कधी सर्प प्रदर्शन भरवणारा एक किशोरवयीन मार्गदर्शक असे प्रकार करत एडवर्ड "हार्वर्ड" या जगविख्यात विद्यापिठात पदवी मिळवण्यासाठी दाखल झाला आणि पुढे याच विद्यापिठात "evolutionary biology" उत्क्रांती जैवशास्त्र या नव्याच विद्याशाखेचा जन्मदाता बनला. 

        हा सर्व प्रवास जितका खडतर आणि मोठा आहे  तितकाच रोमांचकही. या साठ वर्षांच्या प्रदीर्घ धावपळीनंतर आलेले अनुभव डॉ. विल्सन आपल्यासमोर मांडतात. जगाला एखाद्या विषयातील मुलभूत ज्ञान पुरवणारा एक संशोधक कसा तयार होतो, याचं झकास वर्णन या पुस्तकात आहे.
"मुंग्या" या विषयावर एखादा माणूस आयुष्य खर्च करू शकतो हेच आधी आपल्या भारतीय मेंदूला झेपणारे नाही. आपलं घर, संसार आणि वैयक्तिक आयुष्य जपत आठवड्याचे साठ तास काम करणं ही एक भयानक कसरत आहे, असं मान्य करतानाच वैयक्तिक व व्यावसायिक नातेसंबंध कुणाशी व किती जपायचे यावरही डॉ. विल्सन भाष्य करतात.
        लहानग्या एडवर्डच्या बाबतीत सर्वात भारी काय वाटलं असेल तर ते त्याला त्याच्या आवडीनुसार जगण्याचं मिळालेलं स्वातंत्र्य. भले ते पालकांच्या काहीशा दुर्लक्षपणानं असेल पण एडवर्डला कुठलेही क्लास, ट्युशन्स छंदवर्गांना जावं लागत नसे. कुठल्या काका, मामा, मावश्यांकडे जावं लागत नसे. सुटी व फावला वेळ एडवर्ड फुलपाखरांच्या मागे धावण्यात व त्यांचा काही प्रसिद्ध पुस्तकांतून अभ्यास करण्यात घालवत असे. फुलपाखरं व किटक पकडणे त्यांच्या नोंदी ठेवणे हे उद्योग तो आपसुक शिकला.
       "जिथे गर्दी कमी, तिथे मी" या न्यायाने एडवर्ड 'मुंगी' या विषयावर मुलभूत संशोधन करू लागला आणि अल्पावधीतच त्यातील तज्ञ म्हणून मान्यता पावला. कळपाची मानसिकता धुडकावून वेगळ्या वाटेने जाणाऱ्यांचं यश आणि अपयशही अगदी खास असतं. 'नेचर' आणि 'सायन्स' या दिग्गज नियतकालीकात अपयशी प्रयोगांबाबत प्रसिद्ध झालेल्या मोजक्या शोधनिबंधात एडवर्डचा एक निबंध होता. जो प्रयोग नंतर एका शास्त्रज्ञाने बऱ्याच खटपटींनी सिद्ध केला.
जंगलं हीच प्रयोगशाळा असं मानणाऱ्या एडवर्डला दक्षिण अमेरीकेला त्रास देणाऱ्या 'आग्या' मुंग्यावर उपाय शोधायचा होता. तेव्हा प्रयोगासाठी जमा केलेल्या मुंग्यांनी त्याचे हात फोडून काढले होते. अशा अनेक करामतींच्या उदाहरणांनी डॉ. विल्सन संशोधनाचा प्रवास आपल्याला सांगतात.
        

माधुरी शानभाग यांनी या उत्कृष्ट मार्गदर्शनपर पुस्तकाचा तितकास शानदार मराठी अनुवाद केला आहे. फक्त विज्ञानाऐवजी सायन्स या शब्दाचा अतिरीक्त वापर खटकतो.
राजहंस प्रकाशन या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या अनुवादीत पुस्तकात एकूण १७४ पाने असून किंमत रु. २०० इतकी आहे.


Tuesday, November 24, 2015

अमिर खान कुटूंबियांचे स्थलांंतर: एक अ-सरकारी अहवाल.

      अमिर खान या प्रसिद्ध सिनेनटाच्या पत्नी सौ. किरण राव खान यांना देशातील कथित असुरक्षित वातावरणाबाबत वाटत असलेल्या भितीबाबत सदर विभागाने एक व्यापक मत-सर्वेक्षण केले. त्याबाबतचा गोपनीय अहवाल पुढीलप्रमाणे.

१. श्री. सर्वज्ञ पूणेकर. (पूणे)
      "याबाबतीत मला असं म्हणायचैय की कसं आहे. प्रत्येकाची बायको कधी कधी बारीकसारीक तक्रारी करते. पण अशावेळी त्याकडे किती लक्ष द्यायचं ते नवऱ्याने आपल्या कुवतीने ठरवायचं असतं. आता आमच्या लौकीकला - माझ्या मुलाला चांगली शाळा मिळावी म्हणून आम्ही देहूरोडहून पिंपरीत येऊन स्थायिक झालो.
      पण हा कसा सामान्य विषयै. सध्या जगभरातील राजकीय सामाजिक व्यवस्था ही "राष्ट्रराज्य" संकल्पनेवर आधारीतै. अशावेळी देश सोडायच्या वार्तांमुळे वादंग उठणं स्वाभाविकच. त्यात मुलांच्या भवितव्याविषयी देशातील असुरक्षितता हे कारण देणं फारच आक्षेपार्ह. आता अमिर देश सोडून समजा अमेरीकेत गेला तर मुलाचं भवितव्य सुरक्षित नी अमिर बेरोजगार. तिथे हॉलीवूडला स्थिरावायला तो काही इरफान खानइतका कसदार अभिनेता नव्हे. काय? समजलं ना?"

२. अजीत मुंबईकर ( ठाणे)
       मायला बायकांना किती काय आणून द्या. सदाची किटकिट डोक्याला. अॉफीसं लांब पडतात म्हणून आम्ही आता बदलापूरवरून ठाण्यात आलो. इथं घराचे हप्ते भरताना बोच्याची सालं निघतायत आणि बायकोला पोरांना इंटरनॕशनल बोर्डाच्या शाळेत घालायचंय. काय तर म्हणे पोरांच्या भविष्याचा विचार करतेय. अरे, आम्ही गावाकडच्या मराठी शाळेत शिकूनच मोठे झालो ना? इंटरनॕशनल स्कूल बील निव्वळ लुटमारीचे धंदे करतात चुतमारीचे. काय अर्थ नाय त्याला. अमिर शाना असेल तर बायकोच्या नसत्या भूणभूणीकडे दुर्लक्ष करेल. नायतर मेला कर्मानं.

३. हिम्मतराव कोल्हापूरे-पाटील (अध्यक्ष : रंकाळ्याकडील तालीम मंडळ)
       "आरंs अमिऱ्याss गांड्याsss.. मर्दा, तू आसताना कारभारनीला भ्या वाटायं लागलं तं तू काय कामाचा? मायला, आमच्या बायका आमी नसताना वाघीनीवानी येकट्या ऱ्हात्यात शेतावरल्या घरात. तुमाला फूल्ल शेकूरीटी आसताना बी भ्या वाटतंय व्हय रं..?"

४. सदानंद कोकणे.
        आमची ही पन लय काय-काय मागते. पन तेस खरा काय हवा ता माज अचूक कळता. वाराला चार चांगलं मासं आनलं की आटवडाभर गडबड नाय. हितं तसा बगायस गेलंव तर कोनाचाच भविष्य सुरक्षित नव्हता. सगळी मंडळी मुंबय पून्यास नी खंय खंय नोकरी धंद्यास पलाली. कोकन तसा या पलायनाने वस (ओस) पडाचा. पन काय-काय जिद्दी लोका हितं जमंल तसा आंंब्या कोकमाचा उत्पन्न काडून जगलीत. आता जरा बरे दिवस येतंताय. पोरा सोरा मिलून एकत्र येवंन सामुदायिक शेतीचे प्रयोग करतंत हाय. मश्यशेती (मत्स्य शेती) करतंत हाय. हितं पन सगळ्यांचा भविष्य सुरक्षित होयल. नाय! आमी करनार!! जेंका पलायचा आसंल ते पलतील. जे यतील त्यांच्यासोबत, नाय.. त्यांच्या शिवाय.. !कोकण समृद्ध होनार!

५. फातीमाआपा (भायखळा, मध्य मुंबई)
     वो पैले मई वो फोरास रोड के एरया में रैती थी.. वैसे वो एरयेके पैलेसे रैनेवाले लोगोंको कुच धोखा नै हे. पर लडकीयाँ बडी हो रयी हे. फालतू में रीक्स कौन लेंगा. मैं इदर दगडी चॉल के इदर एक छोटासा रूम ली.. वैसे लडकी को किदर भी धोखाच रैता हे. रस्तेपे, इस्कूल में, किलास (ट्यूशन) में, यआ तककी घर में भी.. अमिर पैसेवाला हे, उसको तो इन्कमटॕक्स से लेके बच्चे अगवा करनेवाले गँग तक सबका डर रहेंगा. वैसे अपना देस इत्ता बुरा नै. वो अमरीकामें दो चार वारी सुना हे बच्चेच इस्कूल में फायरींग करके भोत लोगोंको मार डाला. जा भई, तेरे पास पैसा हे , तू किदर बी जा.. डर किसीका पिछा नै छोडता.

६. ओमकार गिरकर (स्थलांतराच्या जागतिक घडामोडींचे अभ्यासक)
       अमिरच्या या देश सोडण्याच्या वक्तव्याकडे स्थलांतराच्या सामान्य घटनेसारखे पाहणे निश्चित शक्य आहे. पण, यामागची जी मानसिकता आहे किंवा त्यामागची जी कारणं आहेत, तसंच त्याच्या संभाव्य परीणामांविषयी स्थलांतर करण्यास इच्छूक माणसांनी काय विचार केला आहे, हे जाणून घेणे महत्वाचे आहे. स्थलांतरामागे जगण्याच्या सुरक्षित आणि अधिक उन्नत पातळीवरील संधी याविषयी भ्रामक किंवा वास्तव कल्पना असू शकतात.. आणि याला कुणीही अपवाद नाही. अगदी अमिरखान सारखा श्रीमंत आणि लोकप्रिय व्यक्तीसुद्धा!
       कोकणातून, उर्वरीत महाराष्ट्रातून तरूण नोकरीच्या शोधात मुंबईत येत असतात. उत्तर भारतातून मुंबईवर बेरोजगारांचे लोंढे आदळत असतात. त्यापेक्षा मोठं चित्र पहायचं तर भारतातून उच्च शिक्षणासाठी आणि चांगल्या पगाराच्या नोकऱ्यांच्या शोधात शेकडो जण दरवर्षी विकसित देशात जातात. तिथलं नागरीकत्व मिळवण्याचा प्रयत्न करतात. याविरोधातही 'ब्रेन ड्रेन' थांबवा असा आवाज उठतो पण तो नगण्य असतो. साधारणतः मध्यम व कनिष्ठ आर्थिक स्तरातील भारतीय नागरीकांच्या मते अमिर सामाजिक-आर्थिक दृष्ट्या प्रचंडच बलशाली आहे. परंतु, माणसाला कुठल्याही स्तरावर भितीपासून मुक्तता नसते. कोणत्या ना कोणत्या प्रकारची भिती ही प्रत्येकालाच सतावते.
       किरण राव बाईंनी आपल्या स्थलांतराच्या बेतामागचं कारण सांगितलं नसतं किंवा अमिर खानने ते माध्यमांसमोर जाहीर केलं नसतं तर ही स्थलांतराची एक सामान्य बाब बनून राहीली असती. अमिरच्या वक्तव्याला राष्ट्राप्रती अविश्वासाचा वास येत असल्याने वादंग निर्माण झाला आहे.
       प्रत्येक पातळीवरील सरकार किंवा राजकीय यंत्रणा सर्वच नागरीकांच्या वैयक्तिक आशा आकांक्षा पूर्ण करण्यात कधीच पुरेसं पडत नाही. कधीकधी परीस्थिती बिकट होते. पण, परीस्थिती सुधारण्यासाठी पुढाकार घ्यायचा त्यांच्याकडून अशी विधानं येणं खरंच दुर्देवी आहे. या परीस्थितीत समाजोपयोगी काम करण्यासाठी नाना पाटेकर हे चित्रपटकर्मींना आदर्श ठरावेत.